मुंबई,दि.4: पंतप्रधान मोदींनी इंधनावरील व्हॅट कमी करण्याचं आवाहन केलं होतं. त्यानुसार लवकरच कॅबिनेट बैठकीत पेट्लो डिझेल स्वस्त करण्यासाठी निर्णय घेणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. विधानसभेत विश्वासमत दर्शक ठराव जिंकल्यानंतर अभिनंदन प्रस्तावावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे वक्तव्य केले.
विधान परिषद निवडणुकीच्या दरम्यान अपमानास्पद वागणूक मिळाली. दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला अन्यायाविरोधात उभं राहण्यास सांगितले. विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर बाहेर पडलो. असे एकनाथ शिंदे म्हणाले.
लढून शहीद झालो तरी चालेल पण माघार नाही. शिवसेना वाचवण्यासाठी प्रयत्न करणार हे त्याच दिवशी ठरवलं असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले. विधानसभेत विश्वासमत दर्शक ठराव जिंकल्यानंतर अभिनंदन प्रस्तावावर बोलताना मुख्यंत्री शिंदे यांनी वक्तव्य केले. असेही एकनाथ शिंदे म्हणाले.
सगळं घडवणारे देवेंद्र फडणवीस आहेत
यावेळी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, इकडे सगळं घडवणारे हे (देवेंद्र फडणवीस) आहेत. राज्यसभेचे आमचे दोन उमेदवार होते. आमचे दोन्ही निवडून येणार होते, आम्ही फूल फिल्डिंड लावली होती. बाळासाहेब थोरात म्हणाले होते आम्ही 42 घेतो, त्यांना आम्ही म्हणालो 42चं घ्या, 44 घेऊ नका, नंतर पुढे अडचण येईल. पण, नंतर त्यांनी 44 घेतली आणि अजित पवारांनी 43 घेतली. तरीदेखील आमची जागा आली असती, पण नंतर साला आमचा माणूस पडला. फडणवीसांनी सारा गेमच पालटला. हे वाक्य म्हणताच, सभागृहात एकच हशा पिकला. यावेळी शिंदेंनी साला शब्द परत घेतला, पण जयंत पाटील उठून म्हणाले की, जे चालू आहे, चालू द्या. जे नैसर्गिक आहे, ते झालंच पाहिजे.
काय म्हणाले मुख्यमंत्री?
“महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर मी राज्याचा मुख्यमंत्री होणार होतो. पण नंतर अजित पवार किंवा इतर कोणीतरी म्हटलं की मला मुख्यमंत्री बनवू नका. त्यावेळी मी म्हटलं मला काहीही अडचण नाही, उलट मी उद्धव ठाकरेंना म्हटलं की त्यांनी पुढे यावं मी तुमच्यासोबत आहे. त्यानंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, माझी मुख्यमंत्रीपदावर कधीही नजर नव्हती,” असे शिंदे म्हणाले.