चक्रीवादळामुळे महाराष्ट्रातील या जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा

0

दि.२७ : पुढचे २, ३ दिवस हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार राज्यात विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र व कोकणात काही ठिकाणी मुसळधार ते अतीमुसळधार पावसाची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले ‘गुलाब’ चक्रीवादळ रविवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या किनाऱ्यावर धडकले. मात्र, त्याचा प्रवास पुढे सुरू राहणार असल्याने राज्यामध्ये याचा काही ठिकाणी परिणाम पाहायला मिळणार आहे. यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रायगड, रत्नागिरी, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, गडचिरोली, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये आणि नाशिक, पुणे, सातारा या जिल्ह्यांमधील घाट परिसरामध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार ते तीव्र मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

चंद्रपुरासाठी सोमवारी ‘रेड अलर्ट’ आहे. तर मंगळवारी ठाणे, पालघर, रायगड, धुळे, जळगाव येथे रेड अलर्ट देण्यात आला आहे. पावसासोबत मेघगर्जना आणि विजांचा कडकडाटही होण्याची शक्यता असल्याने नागरिकांना सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे.

दरम्यान, मुंबई, ठाणे, पालघरमध्ये तुरळक ठिकाणी आज, सोमवारी मुसळधार पाऊस असेल. मात्र, हा जोर मंगळवारी वाढण्याचा अंदाज आहे. पालघर, ठाणे आणि रायगड येथे तुरळक ठिकाणी अतितीव्र मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडू शकेल. मुंबईमध्ये तसेच रत्नागिरीमध्येही मुसळधार ते तीव्र मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडू शकेल. सोलापूर जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, ‘पुढचे २, ३ दिवस राज्यात विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र व कोकणात काही ठिकाणी मुसळधार ते अतीमुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे कृपया काळजी घ्या, काही ठिकाणी तीव्रता जास्त असेल.’ असा इशारा देण्यात आला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here