मुंबई,दि.१८: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ‘सगळे आमदार माजलेत असं बाहेर म्हटलं जातंय’ असे विधान सभेत म्हटले. विधानभवनात आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यात हाणामारी झाली. यावरून विधानसभा अध्यक्ष अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीही याप्रकरणी संताप व्यक्त करत कारवाईच्या सूचना दिल्या आहेत.
सभागृहात याच मुद्द्यावरुन जितेंद्र आव्हाड यांनी बोलताना त्यांना आलेल्या धमक्यांचा उल्लेख केला. यावरुनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संताप व्यक्त करत कधीतरी राजकारणाच्या पलीकडे जाणार आहात की नाही असा सवाल उपस्थित केला.
यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी आपल्याला जीवे मारण्याची धमकी आल्याचा मुद्दा उपस्थित केला. मात्र, विधानसभा अध्यक्षांनी मांडलेल्या प्रस्तावाचा आणि आव्हाडांच्या धमकीच्या मुद्द्याचा एकमेकांशी संबंध नाही, असा आक्षेप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नोंदवला. यावर विरोधकांनी खळखळ करताच देवेंद्र फडणवीस हे संतापल्याचे पाहायला मिळाले.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
“धमकीचा उल्लेख करण्याला मनाई नाही. पण अध्यक्षांनी एखादा प्रस्ताव मांडल्यानंतर कधीतरी राजकारणाच्या पलीकडे जाणार आहात की नाही. तो विषय वेगळा मांडता येईल. ही प्रतिष्ठा कुण्या एका व्यक्तीची नाही. इथे बससेल्या प्रत्येकाची प्रतिष्ठा खराब झाली आहे. आज बाहेर ज्या शिव्या पडत आहेत त्या एकट्या पडळकर किंवा यांच्या माणसाला पडत नाहीत. सगळे आमदार माजले असं आपल्या नावाने बोललं जातं. प्रत्येक गोष्टीचे राजकारण करुन आपण महाराष्ट्रातल्या जनतेला काय सांगणार आहोत,” असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.