Ajit Pawar On Omicron Veriant : महाराष्ट्रासह देशात कोरोनाच्या नवीन व्हेरिएंट ओमिक्रॉन (Omicron) रुग्ण आढळत आहेत. कोरोना (Corona) संकट पूर्णपणे संपणार अशी अपेक्षा असतानाच ओमिक्रॉनने (Omicron) पुन्हा एकदा संपूर्ण जगाची चिंता वाढवली आहे. लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांनाही ओमिक्रॉनची (Omicron) लागण होत असल्याने चिंता व्यक्त होत असून बूस्टर डोससंबंधी चर्चा सुरु आहे. दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांनी यासंबंधी स्पष्ट भूमिका मांडली असून केंद्राला पुढाकार घेण्याचं आवाहन केलं आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
ओमिक्रॉनचे वाढतं संकट पाहता, केंद्र सरकारच्या आरोग्य विभागानं कडक धोरण जाहीर करणं आणि अवलंबनं हे अतिशय गरजेचं आहे. ज्या-ज्या शहरांमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळं आहेत, तिथे एक वेगळी विशिष्ठ नियमावली असायला हवी, असं मत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी स्पष्ट केलं आहे. त्यासोबतच बुस्टर डोसबाबतचा निर्णय केंद्र सरकारनं लवकरात लवकर स्पष्ट करावा, बुस्टर डोस द्यायचा आहे, तर तो का द्यायचाय? आणि जर नाही द्यायचाय, तर का नाही द्यायचाय? याचं स्पष्टीकरण दिलं गेलं पाहिजे. असंही अजित पवार म्हणाले. तसेचस ओमायक्रॉनच्या वाढत्या संसर्गाबाबत जागतिक आरोग्य संघटनेनेही (WHO) तातडीनं पावलं उचलली पाहिजे, असंही ते म्हणाले.
“दोन वर्षांपूर्वीच्या मार्च महिन्यात एक जोडपं दुबईहून राज्यात आलं. त्यानंतर त्यांना घरी सोडणाऱ्या ड्रायव्हरला कोरोना झाला आणि तो संपूर्ण राज्यभरात फोफावला. आताच्याही काळात देशातील वेगवेगळ्या राज्यांत एक-दोन असे रुग्ण आढळून आले होते. पण जिथे कुटुंबाला लागण झाली. त्यांच्यासोबत त्यांच्या नातेवाईकांनाही संसर्ग झाल्याचं पाहायला मिळालं. अनेकजण सांगतात काळजी घ्या, मास्क वापरा याची तीव्रता पूर्वीच्या तुलनेत कमी आहे. पण यासंदर्भात देशपातळीवर आरोग्य विभागानं आणि डब्ल्यूएचओनं याबाबत स्पष्टीकरण देणं गरजेचं आहे.”, असंही अजित पवार म्हणाले.
बुस्टर डोसची गरज आहे का? देशपातळीवर निर्णय घेणं आवश्यक : अजित पवार
“याप्रकरणी अधिक माहिती घेतल्यानंतर स्पष्ट झालं की, ज्यांनी दोन डोस घेतले होते. त्यांनाच या व्हेरियंटची बाधा झाली आहे. मग बुस्टर डोसची गरज आहे का? आज आपल्याकडे डोस उपलब्ध आहेत. त्यासंदर्भातही देशपातळीवर निर्णय घेणं आवश्यक आहे.”, असंही अजित पवार म्हणाले.