दि.17: शिवसेनेच्या पदाधिकारी दीपाली सय्यद (Deepali Sayed) यांनी मोठं विधान केलं होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चर्चा करायला एकत्र येणार असं म्हटलं होते. यानंतर स्वतः पत्रकार परिषदेत त्यांनी आपल्या या दाव्यामागील कारण सांगितलं.
दिपाली सय्यद (Deepali Sayed) म्हणाल्या, की मी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोघांसोबतही बोलले. यानंतर त्यांच्या बोलण्यातून मला जे जाणवलं तेच मी ट्विटच्या माध्यमातून सांगितलं. पुढे त्या म्हणाल्या, सगळ्यांनी पुन्हा एकत्र यावं अशी इच्छा आहे. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी एकत्र यावं असं वाटतं. त्यामुळे अडथळे तोडण्याचं माझं काम सुरू आहे. मान अपमान बाजूला ठेवून प्रत्येकाने शांततेच पवित्रा घेतला आणि एकत्र बसून बोलले तर सगळं ठीक होऊ शकतं, असा विश्वाही त्यांनी व्यक्त केला.
आपल्या ट्विटमध्ये दिपाली सय्यद यांनी भाजपचेही आभार मानले होते. .यावरुन महाविकास आघाडीतून बाहेर पडावं असं तुम्हाला वाटतं का, असा सवाल केला असता त्या म्हणाल्या, की या घडीला प्रत्येक पक्ष आपला आपला विचार करत आहे. त्यामुळे भाजपसोबतची नैसर्गिक युती चांगल्यासाठी होत असेल तर ती त्यांनी करावी.
पुढे त्या म्हणाल्या, की दोघांसोबत बोलून मला असं जाणवलं की दोन्ही गटांचा इगो हर्ट होत आहे. तो बाजूला झाला की सगळं ठीक होईल आणि सगळे सोबत येतील. सगळं ठीक होईल. संजय राऊतांच्या बोलण्यामुळे बंडखोर आमदार जास्त दुखावले का, याबाबत विचारलं असतं दिपाली सय्यद म्हणाल्या, की संजय राऊत त्यांच्या भावना मांडतात. संजय राऊत हे मोठे आहेत त्यांना बोलण्याचा अधिकार आहे. संजय राऊत यांनी शांततेचा पवित्रा घ्यावा आणि मध्यस्थी घडवून आणावी, असंही त्या म्हणाल्या.