Deepali Sayed: दिपाली सय्यद यांची रश्मी ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर टीका

Deepali Sayed: नीलम गोऱ्हे किंवा सुषमा अंधारे या चिल्लर नेत्या आहेत असे दिपाली सय्यद यांनी म्हटले आहे

0

मुंबई,दि.९: दिपाली सय्यद (Deepali Sayed) यांनी रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) आणि संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर टीका केली आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड केल्यानंतर दिपाली सय्यद (Deepali Sayed) शिवसेनेची (ठाकरे गट) बाजू सातत्याने मांडत होत्या. ठाकरे गटाची बाजू आक्रमकपणे लावून धरणाऱ्या नेत्या दिपाली सय्यद या अखेर शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दिपाली सय्यद (Deepali Sayyad) यांनी बुधवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना याबाबतची घोषणा केली.

यावेळी दिपाली सय्यद यांनी संजय राऊत आणि रश्मी ठाकरे यांच्यावर थेट हल्ला करत आगामी वाटचालीचे संकेत दिले. मी एवढंच सांगेन की, संजय राऊत यांना त्यांच्या पापांची शिक्षा मिळाली. पक्ष तोंडाने कसा फोडला जाऊ शकतो, याचं उत्तम उदाहरण म्हणजे संजय राऊत आहेत. त्यांच्यामुळे शिवसेनेते दोन गट पडले. शिंदे साहेबांनी मला शिवसेनेत आणले होते. त्यामुळे सद्यपरिस्थितीत शिंदे साहेबांसोबत उभे राहणे, हे माझे कर्तव्य असल्याचे दिपाली सय्यद यांनी सांगितले.

यावेळी दिपाली सय्यद यांनी आश्चर्यकारकरित्या रश्मी ठाकरे यांच्यावर थेट हल्ला चढवला. मुंबई महानगरपालिकेतून येणारे खोके बंद झाले, याची खंत रश्मी ठाकरे यांना आहे. नीलम गोऱ्हे किंवा सुषमा अंधारे या चिल्लर नेत्या आहेत. या सगळ्यातील महत्त्वाच्या सूत्रधार या रश्मी ठाकरे या आहेत. शिंदे गटाच्या आमदारांनी ५० खोके घेतल्याचा आरोप केला जातो. पण मुंबई महानगरपालिकेतील खोक्यांचं राजकारण नक्की काय आहे, त्यामागील सूत्राधार कोण आहे, या गोष्टी जनतेसमोर आल्या पाहिजेत, असे सांगत दिपाली सय्यद यांनी आगामी काळात राजकीय गौप्यस्फोट करण्याचे संकेत दिले आहेत.

शिंदे गटात दिपाली सय्यद कधी प्रवेश करणार?

दिपाली सय्यद यांनी आज उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे. दिपाली सय्यद यांनी शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची घोषणा केली आहे. स्वतः दिपाली सय्यद यांनी आज आपल्या प्रवेशाची माहिती दिली. शिवसेनेत बंड झाल्यानंतर उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात एकी घडवून आणणार असल्याचं वक्तव्य अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी केलं होतं. मात्र, बंडानंतर उद्धव ठाकरे यांनी रिपब्लिकन चळवळीतील महत्त्वाच्या नेत्या सुषमा अंधारेंना पक्षात आणलं होतं. तेव्हापासून दीपाली सय्यद या नाराज असल्याचं बोललं जात होतं. त्यामुळं गेल्या अनेक दिवसांपासून दिपाली सय्यद या शिंदे गटाच्या वाटेवर असल्याच्या चर्चा होत्या. आज अखेर दिपाली सय्यद यांनी याबाबत घोषणा केली आहे.

दिपाली सय्यद या आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी आल्या होत्या. मात्र, काही कारणास्तव त्यांची मुख्यमंत्र्यांसोबत भेट झालीच नाही. त्यानंतर प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीत त्यांनी अखेर शिंदे गटात जाणार असल्याची घोषणा केली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here