मुंबई,दि.२२: मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) अयोध्या दौऱ्याला भाजप खासदार बृजभूषण सिंह यांनी विरोध केला होता. अयोध्या दौरा तूर्तास स्थगित केल्यानं अनेकांना वाईट वाटलं, काही जणांनी कुत्सितपणे प्रतिक्रियाही दिल्या, अयोध्या दौऱ्याच्या निमित्तानं एक सापळा रचला गेला, त्याला रसद महाराष्ट्रातून पुरवली असे म्हणत राज ठाकरेंनी (Raj Thackeray) पुण्यातील सभेस सुरुवात केली.
राज ठाकरे म्हणाले, भोंग्यांचा विषय आपण काढला, तेव्हा भारताच्या इतिहासात पहिल्यांदा सकाळच्या अजान बंद झाल्या. जवळपास ९२ ते ९४ टक्के ठिकाणी आवाज कमी झाले. माझी मागणी लाऊडस्पीकरच निघण्याची आहे. पण तुम्ही जोपर्यंत असे वेंधळ्यासारखे राहणार, तोपर्यंत ही माणसं अशीच घुसत राहणार.
भोंग्यांचं आंदोलन एका दिवसाचं नाही. या गोष्टीला सातत्य नसेल, तर पुन्हा सगळ्या गोष्टी सुरू होणार. ते फक्त तुम्हाला तपासत आहेत. हे विसरले, की हळूहळू आवाज वर यायला सुरू होणार. आत्ता सुरू केलंय ना, एकदाचा तुकडा पाडून टाका. यावेळी त्यांनी एक पत्र लिहून देणार असून ते घराघरात पोहोचवण्याचं आवाहन मनसैनिकांना केलं. तसंच हे एक आंदोलनच असल्याचंही त्यांनी म्हटलं. यावरून शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांनी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.
“पत्रक घरोघरी दिल्यानंतर तुम्ही आदोंलन करून जेलमध्ये जाणार आणि अमित ठाकरे लपून बसणार, हा शिलेदारांसाठी मोठा ट्रॅप आहे. घाबरलेला भोंगा आज महाराष्ट्राने पाहिला,” असं म्हणत दीपाली सय्यद यांनी राज ठाकरे यांना टोला लगावला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.