पणजी,दि.30: शिवसेनेचे बंडखोर आमदार दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली. राष्ट्रवादी पक्षाने शिवसेना संपवण्याचे काम केले. सत्तेतून बाहेर झालेल्या राष्ट्रवादीला शिवसेनेमुळे सत्तेत बसण्याची संधी मिळाली मात्र राष्ट्रवादीने शिवसेना संपवण्याचे काम केले असे दीपक केसरकर म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर आम्हालाही दुःख झाले आहे, असेही ते यावेळी म्हणाले.
संजय राऊत राष्ट्रवादीचं काम करतात
दीपक केसरकर म्हणाले, “आता जी युती होत आहे ती महाराष्ट्राच्या जनेतेने निवडून दिलं त्यांची होत आहे. त्यामुळे संजय राऊत यांनी पाठीत खंजीर खुपसल्याची भाषा करू नये. पाठीत कुणी खंजीर खुपसला असेल तर तो संजय राऊत यांच्यासारख्या लोकांनी खुपसला. त्यांनी चुकीचा सल्ला दिला. संजय राऊत स्वतः शिवसेनेत आहेत, मात्र निम्म काम राष्ट्रवादीचं करत असतात. त्यावेळी ते जनतेच्या पाठीत खंजीर खुपसत असतात.”
एकनाथ शिंदे एकवचनी
एकनाथ शिंदे एकवचनी आहेत, त्यांनी एका मोठ्या पक्षाला शब्द दिला होता, त्यामुळे हा शब्द फिरवणं शक्य नव्हतं, दीपक केसरकर यांची माहिती.
उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर सेलिब्रेशन केलं नाही
दीपक केसरकर म्हणाले, “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला. यानंतर सेलिब्रेशन सुरू असल्याचं बोललं जातंय, मात्र इथं कुणीही उत्सव साजरा केला नाही. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा द्यावा यासाठी आमचा बंड नव्हता. आमचा बंड आघाडीविरोधात होता. उद्धव ठाकरेंचं मन दुखावं हा हेतू नव्हता.”
संजय राऊत केंद्र व राज्यात वाद लावून देत आहेत
आज महाराष्ट्रात अशी परिस्थिती आहे आहे की संजय राऊत यांनी सकाळी ९ वाजता उठून एक पत्रकार परिषद घ्यायची. केंद्रावर टीका करायची आणि केंद्र व राज्यात वाद लावून द्यायचा असं सुरू आहे. त्यामुळे महाराष्ट्राची प्रगती करायची असेल तर केंद्र व राज्य यात चांगले संबंध असावे लागतील. हीच आमची भूमिका आहे. : दीपक केसरकर