उस्मानाबाद,दि.26: राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी मराठा आरक्षणाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. तानाजी सावंत यांनी मराठा आरक्षणाबाबत धक्कादायक विधान केलं आहे. दोन वर्ष मराठा आरक्षण गेल्यामुळे गप्प होते, आता सत्तांतर झाल्यावर लगेच मराठा आरक्षणाची खाज सुटली, मिळालीच पाहिजे’ असं वक्तव्य तानाजी सावंत यांनी केलं आहे. त्यांच्या या विधानामुळे वाद पेटण्याची चिन्ह आहे.
उस्मानाबादमध्ये शिंदे गटाचा हिंदु गर्व गर्जना मेळावा पार पडला. यावेळी बोलत असता तानाजी सावंत यांनी अप्रत्यक्षपणे संभाजीराजे यांच्यावर निशाणा साधला.
‘ज्या समाजात मी जन्मलो त्या समाजासाठी मी आहेच, मग बाकीच्या जातींचा द्वेष करा असं थोडी आहे. यांचे डोक बघा कसं चालतंय. कधी ओबीसीतून आरक्षण द्या, आम्हाली एससी समाजातून आरक्षण मागितले जात आहे. नेमकं यामागे डोक कुणाचं आहे, हे लोकांना लक्षात आले पाहिजे. दोन महिन्यांपूर्वीच सत्तांतर झाले आणि लगेच आरक्षणाची खाज सुटली, असं वक्तव्य सावंत यांनी भर सभेत केलं.
आता बघा यांचं सरकार आलं, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना प्रचंड त्रास देण्याचा प्रयत्न केला. मराठा आरक्षणासाठी राज्यभरात मुक मोर्चे काढण्यात आले. त्यांचा अपमान केला, आम्ही गप्प बसलो. ब्राह्मण म्हणून टीका करण्यात आली. पण, याच ब्राह्मणाने 2017-18 ला याच मराठा समाजाची झोळी भरली. मराठ्यांना आरक्षण दिलं. दोन तीन बॅच बाहेर आल्या, ज्यावेळेस 2019 ला लोकांचा विश्वासघात करून ही लोक सत्तेवर आली आणि 6 महिन्यात मराठा आरक्षण गेलं, अशी टीका सावंत यांनी केली.
म्हणजे आम्ही मराठे इतके मुर्ख आणि आम्हाला काहीच कळत नाही. सगळे शांत आणि जसं आम्ही सत्तांतर केलं, 2 अडीच महिने झाले. लगेच सोशल मीडिया सक्रीय झाला. मराठा आरक्षण मिळालंच पाहिजे सुरू झालं, असं आरोपच सावंत यांनी केला.
मराठा क्रांती मोर्चाचा मी हितकरता आहे,त्याचा समर्थक आहे, छातीठोकपणे सांगतो हो आहे. समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, वेळ आली तर सत्ता सोडेन आणि राजीनामा सुद्धा देऊन टाकेन, असंही सावंत म्हणाले.