सोलापूर,दि.१६: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी सोलापुरात मोठे विधान केले आहे. सोलापूर-मुंबई विमानसेवेचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. येत्या काळात नाईट लँडींग सुविधा निर्माण करण्याचे संकेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. तसेच सोलापूरला आयटी पार्क उभारण्यात येईल असेही फडणवीस म्हणाले. नुकत्याच झालेल्या पावसामुळे जिल्ह्यात अनेक गावात पूर आला होता. पूर परिस्थितीमध्ये उत्कृष्ट काम केल्याबद्दल पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी कौतुक केले.
फडणवीस म्हणाले, “नव्याने सुरू करण्यात आलेल्या सोलापूर-मुंबई विमानसेवेमुळे सोलापूर परिसरातील औद्योगिक विकासाला गती मिळेल, पर्यटनक्षेत्राला चालना मिळून रोजगाराच्या नव्या संधी निर्माण हेातील. येत्या काळात सोलापूरला नाईट लँडींग सुविधा आणि मोठे बोईंग विमानसेवा सुरू करण्याचे प्रयत्न करण्यात येतील, त्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे.”
कार्यक्रमाला केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, माजी मंत्री आमदार सुभाष देशमुख, आमदार विजयराव देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, देवेंद्र कोठे, माजी खासदार जयसिद्धेश्वर स्वामी, माजी आमदार नरसिंग मेंघजी, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, कोल्हापूर परिक्षेत्र आय जी सुनील फुलारी, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, मनपा आयुक्त सचिन ओंबासे, पोलीस शहर आयुक्त एम. राजकुमार, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, स्टार एअरचे संजय घोडावत, एअरपोर्ट ऑथॉरिटीच्या सहायक व्यवस्थापक अंजनी कुमारी आदी उपस्थित होते.
सोलापूरकरिता अत्यंत महत्वाचा दिवस असल्याचे नमूद करून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, शहराचा विकास, रोजगार निर्मिती आणि औद्योगिक विकासासाठी हवाई सेवा महत्वाची आहे. उद्योजक हवाई सेवेची उपलब्धता पाहून गुंतवणुकीचा निर्णय करतात. जगाच्या बाजाराशी जोडले जात असतांना विमानसेवा असणे महत्वाचे आहे. सोलापूरमध्ये विमानतळ असूनही विमानसेवा सुरू होत नव्हती. सोलापूर परिसरात कोणतेही विमानतळ नसल्याने पर्यटनाच्यादृष्टीने या महत्वाच्या जिल्ह्यातील विमानसेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले, विमानतळाचे नुतनीकरण करण्यात आले.
विमानसेवेचे महत्व लक्षात घेवून केंद्र सरकारने आरसीएससारखी योजना सुरू केली. राज्य सकरकारने सोलापूरसाठी या योजनेअंतर्गत विमानसेवेतील तुट भरून काढण्याचे मान्य केले. आरसीएसच्या माध्यमातून गॅप फंडिंग म्हणून १८ कोटींची रक्कम देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतल्यानंतर ही विमानसेवा सुरू होत आहे. सोलापूरचे विमानतळ कार्यान्वित झाल्याने लवकरच सोलापूरला आयटी पार्क उभारण्यात येईल. त्यामुळे स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सोलापूर शहराच्या विकासासाठी राज्य शासन प्रयत्न करत असून जलवितरण वाहिनीसाठी एक हजार कोटीचा निधी देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे शहरात दररोज शुद्ध पाणी पुरवठा करण्यात येईल. सोलापूर हे दक्षिणेकडे जाण्याचे गेट-वे आहे. पंढरपूर, तुळजापूर, सोलापूर ही धार्मिकस्थळे विमानसेवेमुळे मुंबईशी जोडली गेल्याने भाविकांची संख्या तिप्पट वाढून रोजगारही वाढेल, असेही फडणवीस म्हणाले.
केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ म्हणाले, सोलापूर-मुंबई विमानसेवेची नागरिकांची मागणी पूर्ण होत आहे, ही सोलापूरकरांना दिवाळीची दिलेली भेट आहे. सोलापूर हे राज्यातील दक्षिण-पश्चिमेकडील महत्वाचा जिल्हा आहे. देवभूमी म्हणून या जिल्ह्याची ओळख आहे. वस्त्रोद्योगासाठी हा जिल्हा प्रसिद्ध आहे. विमानसेवेच्या माध्यमातून सोलापूर देशाच्या आर्थिक राजधानीला जोडले जात असल्याने उद्योग-शेती विकासाला चालना मिळून रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. ‘उडान’ योजनेअंतर्गत ६५ कोटी रुपये खर्च करून विमानतळ टर्मिनल इमारत उभारण्यात आली आहे. सोलापूर-मुंबई विमानसेवेसाठी आर्थिक तूट भरून काढण्यासाठी राज्य शासनाने हमी घेतल्याने ही विमानसेवा सुरू होत आहे.
सोलापूर-हैद्राबाद आणि तिरुपती विमानसेवा सुरू करण्यात येईल
येत्या काळात हैद्राबाद आणि तिरुपतीसारख्या शहरांना जोडणारी विमानसेवा सुरू करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. देशातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील सर्वाधिक विमानतळ कार्यान्वित असून राज्यातील विमानसेवेचा विस्तार करण्यासाठी आवश्यक सुविधांचा विकास करण्यात येत असल्याचेही मोहोळ म्हणाले. देशातील पहिले समुद्रातील विमानतळ पालघर येथे उभारण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली.








