दि.27: Uddhav Thackeray: महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या राजकीय घडामोडीच्या (Maharashtra Political Crisis) पार्श्वभूमीवर राज्यपाल कधीही फ्लोर टेस्टबाबत (बहुमत सिद्ध करण्याबाबत) बोलू शकतात, असे सूत्रांचे म्हणणे आहे. दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दोनदा राजीनामा द्यायचा प्रयत्न केला होता, पण शरद पवारांनी (Sharad Pawar) त्यांना रोखले, अशी बातमी समोर आली आहे.
शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यासहित पक्षाच्या आमदारांनी बंड पुकारलं असल्याने महाविकास आघाडी सरकार अस्थिर होण्याची भीती निर्माण झाली आहे. दुसरीकडे सुप्रीम कोर्टाने शिंदे गटातील आमदारांना 12 जुलैपर्यंत दिलासा दिला असून तोपर्यंत त्यांना अपात्र ठरवता येणार नाही. राज्यात वेगवान राजकीय घडामोडी घडत असताना आणखी एक महत्वाची माहिती समोर आली आहे. इंडिया टुडेने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, उद्धव ठाकरे आज मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार होते.
दीपक केसरकर यांनी केली राजीनाम्याची मागणी
दुसरीकडे शिंदे गटाचे आमदार दीपक केसरकर म्हणाले की, आम्हाला शिवसेना आणि भाजपचे सरकार हवे आहे. राज्यात चांगले सरकार आले तर चांगले काम होईल. ते म्हणाले की, महाराष्ट्र सरकार अल्पमतात आहे. उद्धव ठाकरे सरकारने पराभव मान्य करून राजीनामा द्यावा.
सूत्रांच्या माहितीनुसार, उद्धव ठाकरे आज राज्याच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊ इच्छित होते. पण राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी उद्धव ठाकरेंना राजीनामा देण्यापासून थांबवलं.
मिळालेल्या माहितीनुसार, शरद पवारांनी याआधी उद्धव ठाकरेंना एकदा नाही तर दोनदा राजीनामा देण्यापासून रोखलं आहे. एकनाथ शिंदे आणि २१ आमदार सूरतमध्ये गेले होते त्याच दिवशी उद्धव ठाकरे राजीनामा देण्याच्या तयारीत होते. फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून उद्धव ठाकरे राजीनामा देत याची घोषणा करणार होते. पण शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना रोखलं अशी सूत्रांची माहिती आहे.
दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे राजीनामा देण्याचा विचार करत होते. उद्धव ठाकरेंनी अधिकाऱ्यांची बैठकही बोलावली होती. पण पुन्हा एकदा शरद पवारांनी मध्यस्थी केली.