मुंबई,दि.15: शिवसेनेचा दसरा मेळावा मुंबईतील षण्मुखानंद हॉलमध्ये सुरू आहे. यावेळी नेहमी प्रमाणे ‘जमलेल्या माझ्या तमाम हिंदू माता आणि बंधू भगिनींनो…असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणाला सुरुवात झाली. आम्ही कोणाच्या अंगावर जात नाही आणि कोणी आल तर सोडत नाही. हिम्मत असेल तर आमचं सरकार पाडून दाखवा. उद्धव ठाकरे यांनी पुन्हा दिले आव्हान.
‘तुम्ही वचन मोडलं. आणि मी मुख्यमंत्रिपद स्विकारलं आणि कारण माझ्या पित्याला मी वचन दिलं होतं. मी तुमच्या शिवसैनिक मुख्यमंत्री करून दाखवले, असं वचन आणि जबाबदारी घेतली. कदाचित जर दिलेले वचन भाजपने पाळलं असतं तर कदाचित मी राजकीय जिवनातून बाजूला सुद्धा झालो असतो. हे माझं क्षेत्र नाही, मी एक पूत्र कर्तव्य पार पडण्यासाठी ठामपणे उभा आहे’ असं विधान शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं.
आज दोन मेळावे असतात एक संघाचा आणि आपला मेळावा आहे. विचार एकच आहे, पण धागे वेगळे आहे. विचार एकच आहे म्हणून युती केली होती. आजही त्यांना वाटतं मुख्यमंत्री व्हावं वाटलं असतं. त्यांनी जर शिवसेनेचे वचन मोडलं नसतं तर तुम्ही मुख्यमंत्री झाला असता. पण तुमच्या नशिबात नव्हतं, असा सणसणीत टोला उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला.
महाराष्ट्रात लोकशाहीचा गळा घोटला गेला आहे तर उत्तर प्रदेशात काय लोकशाहीचा मळा फुलला आहे काय?; उपरे उमेदवार घेतात आणि जगातला सर्वात मोठा पक्ष म्हणतात. उद्धव ठाकरे यांचा टोला.
‘जर तुम्हाला धमकी द्यायची असेल तर स्वत: च्या लायकीनुसार द्या, ईडी सीबीआय आणि इन्कम टॅक्सच्या मागे उभे राहुन काय बोलता. मी सुद्धा आज पक्षप्रमुख म्हणून बोलायचं झालं तर शिवसैनिकांच्या ताकदीतून उत्तर द्यायला तयार आहे. पोलिसांच्या मागे लपून बसायचे म्हणजे हे नामर्दपणा आहे’ अशी टीकाही उद्धव ठाकरेंनी केली.