मुंबई,दि.28: केंद्रीय निवडणूक आयोगाने नुकताच महाराष्ट्र दौरा केला. यानंतर त्यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेतली. केंद्रीय निवडणूक आयोगाने जवळपास 11 राजकीय पक्षांसोबत बैठक घेतली. यात दिवाळी आणि इतर उत्सवाला लक्षात घेता निवडणूक जाहीर करण्यात यावी अशी नेत्यांची भूमिका होती. तसेच मतदारांसाठी व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी पक्षाकडून करण्यात आली. त्यामुळे दिवाळीनंतरच महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होतील असे स्पष्ट झाले आहे.
पोलिंग एजंट त्याच मतदारसंघाचा असावा अशी काही पक्षांनी विनंती केल्याच निवडणूक आयोगाने सांगितलं. मतदान केंद्रात मोबाईल घेऊन जाण्यास मनाई करण्याची मागणीही पक्षांनी केली. फेक न्यूज रोखण्याची मागणी त्यांनी केली. फेक न्यूज कसे रोखणार याची माहिती आम्ही दिली असं निवडणूक आयोगाने सांगितलं.
शनिवारी केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी महाराष्ट्रात होणाऱ्या आगामी निवडणुकांविषयी भाष्य केले. 26 नोव्हेंबर रोजी विधान सभेचा कार्यकाळ संपणार आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात सध्याच्या घडीला 9. 59 कोटी मतदार असून पहिल्यांदा मदतान करणाऱ्यांची संख्या 19.48 लाख आहे. महाराष्ट्रत एकूण 1,00,186 पोलिंग बूथ असून यात अर्बन बूथची संख्या 42,585 तर रूरल पोलिंग बूथची संख्या 57,601 इतकी आहे.
निवडणूक कधी?
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले, “महाराष्ट्रात होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी आम्ही येथे आलो आहोत. आम्ही या दौऱ्यादरम्यान राष्ट्रीय पक्ष आणि प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. आम्ही भागधारक, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त आणि डीजीपी यांची भेट घेतली. आम्ही बसपा, आप, सीपीआय (एम), काँग्रेस, मनसे, सपा, शिवसेना (ठाकरे गट), शिवसेना अशा एकूण 11 पक्षांच्या नेत्यांची भेट घेतली. त्यांनी निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्यापूर्वी दिवाळी, देव दिवाळी आणि छठपूजा यासारख्या सणांचा विचार करावा, अशी सूचना केली आहे.”
ज्या नेत्यांवर गुन्हे दाखल आहेत त्यांना स्थानिक वृत्तपत्र आणि चॅनलमध्ये तीनदा जाहिरात द्यावी लागणार आहे. त्या जाहिरातीत त्यांच्यावर कोणते गुन्हे दाखल आहेत, ते सांगावे लागणार आहे. तसेच राजकिय पक्षांनाही हा नियम लागू होणार आहे. त्यांना गुन्हे दाखल असलेल्या नेत्याला उमेदवारी का दिली ते सांगावे लागणार आहे.