मुंबई,दि.१६: महाराष्ट्रातील ९ जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. केरळसह दक्षिण भारतातील काही राज्यांना पावसाने झोडपून काढलेलं असताना महाराष्ट्रातीलही नऊ जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसंच मोसमी पावसाची प्रगती वेगाने होत असल्याने पुढील काही तासांमध्ये हा पाऊस अंदमान आणि निकोबार बेटांवर धडक देण्याची शक्यता आहे.
राज्यात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात पूर्वमोसमी पाऊस हजेरी लावेल, असं हवामान खात्याचा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, परभणी, नांदेड आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.
नैऋत्य मोसमी वाऱ्यांचे आगमन होण्याच्या अपेक्षेच्या काही दिवस आधीच केरळमध्ये पावसाचा जोर कायम आहे. सोमवारी पाच जिल्ह्यांमध्ये अत्यंत मुसळधार पाऊस पडण्याचे संकेत देऊन हवामान खात्याने येथे रेड अॅलर्ट जारी केला आहे. एर्नाकुलम, इडुक्की, त्रिचूर, मलप्पुरम, कोझिकोडे जिल्ह्यांना रविवारसाठी तर एर्नाकुलम, इडुक्की, त्रिचूर, कोझिकोडे, कन्नूर या जिल्ह्यांना सोमवारसाठी हा इशारा देण्यात आला. आणीबाणीच्या कोणत्याही परिस्थितीसाठी सज्ज राहण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याचे महसूलमंत्री के. राजन यांनी पत्रकारांना सांगितले.