केंद्रीय निवडणूक आयोगाचे उद्धव ठाकरेंवर कारवाई करण्याचे आदेश

0

मुंबई, दि.3: केंद्रीय निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरेंवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत. यामुळे आता उद्धव ठाकरेंच्या अडचणीत वाढ झाली आहे. उद्धव ठाकरे यांनी 20 मे रोजी मतदान सुरु असताना पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले होते. या पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगासह भाजपला टार्गेट केल्याची तक्रार भाजप नेते आशिष शेलार यांनी निवडणूक आयोगाकडे केली होती.

केंद्रीय निवडणूक आयोगाने यासंदर्भात चौकशी करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाला दिले होते. उद्धव ठाकरेंची संपूर्ण पत्रकार परिषद निवडणूक आयोगाकडून तपासून पाहण्यात आली. यात काही वादग्रस्त असेल तर उद्धव ठाकरेंवर कारवाई करण्यात येणार असल्याचं संकेत देण्यात आले होते.

मुंबई, ठाणे, नाशिकसह राज्यातील 13 मतदारसंघात 20 मे रोजी मतदान शेवटच्या टप्प्यातील मतदान झालं. मतदानासाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं दृश्य जागोजागी दिसलं. कडक उन्हात तब्बल 4 ते 5 तास मतदार रांगेत तिष्ठत उभे होते. मतदान केंद्रावर पुरेशा सुविधांचा अभाव आणि मतदानाला होणारा उशीर यामुळं कंटाळून अनेकांनी घरी जाणं पसंत केलं. वृद्ध मतदार आणि महिलांना रांगेत उभं राहिल्यानं प्रचंड त्रास झाला.

मुंबईत मतदानात झालेल्या दिरंगाईमुळे उद्धव ठाकरे संतापले होते. निवडणूक आयोग पक्षपातीपणा करत असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी सेना भवनमध्ये संध्याकाळी पत्रकार परिषद घेऊन केला. मुंबईत ठिकठिकाणी संथ गतीनं मतदान होत असल्याचा आक्षेप उद्धव ठाकरेंनी घेतला होता. निवडणूक आयोग पक्षपातीपणा करत असल्याचा आरोप ठाकरेंनी केला. तर मुंब्र्यात एका तासात केवळ 11 जणांचं मतदान झालं, त्यासाठी संजय राऊतांनी भाजप आणि शिवसेना शिंदे गटावर खापर फोडलं.

काय होऊ शकते कारवाई?

निवडणुकीच्या काळात आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी फौजदारी कारवाई केली जाण्याची शक्यता असते. राज्य निवडणूक आयोग त्या व्यक्तीवर निवडणुकीच्या काळात प्रचारबंदीसारखे निर्बंध लागू करु शकते. जर फौजदारी गुन्हा दाखल झाला तर खटला देखील चालवला जाऊ शकतो.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here