इंदापूर,दि.24: Car Accident: कार अपघातात तीनजण जागीच ठार तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. इंदापूर तालुक्यातील भिगवण येथे कारचा भीषण अपघात झाला असून त्यात तिघांचा जागीचमृत्यू झाला आहे. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून कारने पलटी खाल्ली त्यात तिघांचा जागेवरच मृत्यू झाला आहे तर एक व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे. संदीप राजाभाऊ माळी( वय 35) , बालाजी केरबा तिडके( वय 48) आणि सरस्वती राजाभाऊ माळी (वय 61) असं या अपघातामध्ये मृत्यू झालेल्यांची नावं आहेत. हे तिघेही लातूर जिल्ह्यातील रहिवासी आहेत.चंद्रकांत रामकिशन गवळी (वय 54) असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शुक्रवारी पहाटे पावणेचारच्या दरम्यान पुणे – सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर सोलापूर – पुणे या लेनवर इंदापूर तालुक्यातील डाळज नं. 1 गावाच्या हद्दीत ही स्विफ्ट कार वेगात जात होती. गाडीचा वेग खूपच जास्त होता. त्यामुळे चालकाचे कारवरील नियंत्रण सुटून कारने तीनवेळा पलटी मारली. कार क्र. एम एच 43 बी एन 1402 असा कारचा नंबर असून ती पुण्याच्या दिशेने येत होती. भिगवण बस स्थानकापासून काही अंतरावर हा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर एक जण जखमी झाला आहे. या जखमी व्यक्तीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.