दि.28: भारतीय जनता पार्टीचे भारतीय राजकारणात अनेक दशकांपर्यंत वर्चस्व राहणार असल्याचे निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी म्हटले आहे. काँग्रेसचे राहुल गांधी यांची मोदी युग संपण्याची वाट पाहणे ही चूक आहे, असेही प्रशांत किशोर यांनी म्हटले आहे. राहुल गांधी हे भाजप मोदी लाट असेपर्यंत सत्तेत राहणार आहेत या भ्रमात आहेत, असंही ते म्हणाले. मोदी सरकारने (PM Narendra Modi) पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढवल्या आणि तरीही त्यांच्याविरोधात मोठा जनक्षोभही निर्माण झालेला नाही, असंही ते म्हणाले.
राहुल गांधी आणि काँग्रेसनं वेळीच नरेंद्र मोदींची ताकद समजली पाहिजे. येत्या काही दशकांपर्यंत भाजपचं स्थान मजबूत असेल. शिवाय काही मुद्द्यांच्या आधारे नरेंद्र मोदींना सत्तेतून हटवू शकतो, असं मानणं ही चूक असू शकते, असा इशारा राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी दिलाय. पुढची आणखी काही वर्षे काँग्रेस आणि विरोधकांना भाजपविरोधात मोठा लढा द्यावा लागेल, असंही प्रशांत किशोर यांनी म्हटलं. गोव्यात तृणमूल काँग्रेससाठी काम करणाऱ्या प्रशांत किशोर यांनी हा इशारा दिला.
प्रशांत किशोर गोव्यात एका कार्यक्रमात म्हणाले की, भाजप कुठेही जाणार नाही. भाजपा जिंकेल किंवा हरेल मात्र काँग्रेसच्या 40 वर्षांच्या कारभाराप्रमाणेच ते भारतीय राजकारणाच्या केंद्रस्थानी राहतील. तुम्हाला भारतात 30 टक्के मते मिळाली की तुम्ही इतक्या लवकर कुठेही जाणार नाही. लोकं संतप्त होऊन मोदींना हटवून टाकतील या गैरसमजात पडू नका. लोक मोदींना हटवू शकतात, पण भाजप कुठंही जाणार नाही. पुढील अनेक दशकं तुम्हाला भाजपचा सामना करावा लागेल असंही ते म्हणाले.