दि.22: केंद्रीय मंत्री विश्वेश्वर टुडू (Bishweswar Tudu) यांच्यावर एका सरकारी अधिकाऱ्याने आढावा बैठकीत हल्ला करून मारहाण करून हात मोडल्याचा आरोप केला आहे. अधिकाऱ्याच्या हातावर पट्टी बांधण्यात आली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
केंद्रीय मंत्री विश्वेश्वर टुडू (Bishweswar Tudu) यांचे मूळ गाव ओडिशातील बारीपाडा येथील ही घटना आहे. विश्वेश्वर टुडू हे केंद्रात आदिवासी व्यवहार आणि जलशक्ती राज्यमंत्री आहेत. केंद्रीय मंत्र्यांनी त्यांच्या कार्यालयात बैठक बोलावली होती. या बैठकीत जिल्हा नियोजन व संनियंत्रण विभागाचे उपसंचालक अश्विनीकुमार मलिक आणि सहायक संचालक देबाशीष महापात्रा यांना बोलावण्यात आले होते. ही घटना शुक्रवारी घडली.
आढावा बैठकीत भडकले मंत्री
आढावा बैठकीदरम्यान मंत्री एका गोष्टीवरून चांगलेच भडकले आणि त्यांनी आतून दरवाजा बंद करून दोन्ही अधिकाऱ्यांवर खुर्चीने हल्ला केल्याचे पीडितांचे म्हणणे आहे. या हल्ल्यात देबाशिष महापात्रा यांचा हात तुटला (फ्रॅक्चर) आहे. तर अश्विनी कुमार मलिक जखमी झाले आहेत. दोन्ही अधिकाऱ्यांना बारीपाडा येथील पीआरएम मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले आहे.
जखमी अधिकाऱ्यांपैकी एक देबाशीष महापात्रा म्हणाले, “आम्ही प्रोटोकॉलचे उल्लंघन केले आहे असे सांगून मंत्र्यांनी प्रथम आम्हाला खडसावले. आम्ही त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला की, आदर्श आचारसंहितेच्या वेळी आम्ही फाइल्स घेऊन त्यांच्या कार्यालयात गेलो तर ते अन्यायकारक, चुकीचे ठरले असते. आगामी पंचायत निवडणुकांमुळे राज्यात आदर्श आचारसंहिता लागू आहे. पण, ते संतापले आणि त्यांनी आम्हाला मारहाण करण्यास सुरुवात केली.
दोन सरकारी अधिकाऱ्यांनी नोंदवलेल्या तक्रारीच्या आधारे केंद्रीय मंत्र्याविरुद्ध आयपीसीच्या कलम 323, 325, 294 आणि 506 अंतर्गत बारीपाडा टाउन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, केंद्रीय मंत्री बिश्वेश्वर टुडू यांनी हे आरोप स्पष्टपणे फेटाळले असून पंचायत निवडणुकीपूर्वी आपली प्रतिमा खराब करण्याचा हा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की, आरोप खोटे आणि निराधार आहेत. “ते माझ्याकडे आले, आम्ही जवळपास अर्धा तास बसलो, जेवणाची वेळ होती, आढावा बैठक पूर्ण होऊ शकली नाही, म्हणून मी त्यांना उद्या पुन्हा येण्यास सांगितले, ते परत आलेच नाहीत,” असे केंद्रीय मंत्री म्हणाले.