“मीरा बोरवणकर यांनी अजित पवार यांच्यावर जे आरोप केले त्यावर…” रामदास आठवले

0

चंद्रपूर,दि.१६: पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या ‘मॅडम कमिश्नर’ या पुस्तकामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पोलिसांच्या जमिनीचा हस्तांतरणाचा आदेश देण्यात आल्याचा गौफस्फोट करण्यात आला आहे. यावरून राज्याचे राजकारण तापले असतानाच चंद्रपूर येथे आलेल्या केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही यावर आपली प्रतिक्रिया दिली. येरवडा तुरुंगाच्या बाजूला जमीन घेऊन इमारत बांधणे हे चुकीचे असून तुरुंगाच्या बाजूला इमारत बांधल्यास कधी तुरुंगात जावे लागेल, हे काही सांगता येत नाही, असे ते म्हणाले.

मीरा बोरवणकर ह्यांच्या पोलीस कारकिर्दीत त्यांचा सर्वत्र दरारा राहिलेला आहे. कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांनी अजित पवार यांच्यावर जे आरोप केले त्यावर आपण काही सांगू शकणार नाही. यात काय तथ्य आहे अथवा नाही हे स्वत: अजित पवारच सांगू शकतील, असेही आठवले म्हणाले. चंद्रपूर विधानसभेवर अपक्ष आमदार किशोर जोरगेवार निवडून आले आहेत. भाजप ही जागा जिंकू शकली नाही. चंद्रपुरात आंबेडकरी चळवळ मजबूत आहे, इतर समाजही आरपीआयसोबत आहे. त्यामुळे या जागेवर आरपीआय दावा सांगणार असल्याचेही आठवले यांनी यावेळी सांगितले.

केंद्राचा निधी आता ६० टक्के केंद्रीय सामाजिक न्याय विभागाच्या अनेक योजनांसाठी केंद्राकडून केवळ दहा टक्के निधी दिला जात होता. मात्र आपण मंत्री झाल्यानंतर ही बाब पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निदर्शनास आणून दिली. आता ६० टक्के निधी हा केंद्राचा असतो तर ४० टक्के निधी हा राज्य सरकारचा असतो. यासाठी १५ हजार कोटींची अतिरिक्त तरतूद करण्यात आली आहे. तसेच परदेशात शिक्षण घेणाऱ्या शिष्यवृत्तीच्या विद्यार्थ्यांच्या संख्येमध्ये देखील वाढ करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही आठवले यांनी यावेळी सांगितले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here