मुंबई,दि.७: क्रूझ ड्रग पार्टीवर करण्यात आलेली कारवाई बोगस असल्याचा दावा राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी केला होता. एनसीबीचे समीर वानखेडे यांनी खंडणी गोळा करण्यासाठीच ही कारवाई केल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला होता. ड्रग पार्टी प्रकरणातील पंच साक्षीदार किरण गोसावीच्या बॉडीगार्डने आर्यन खानला सोडण्यासाठी शाहरुख खानकडे २५ कोटींची मागणी केल्याचे सांगून खळबळ उडवून दिली होती. आर्यन खान ड्रग्ज प्रकरणासह (Aryan Khan Drugs Case) अन्य सहा प्रकरणांचा तपास समीर वानखेडे यांच्याकडून काढून घेण्यात आल्यानंतर या प्रकरणांचा तपास करण्यासाठी नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरानं (NCB) विशेष तपास पथक (SIT) स्थापन केलं आहे. ही एसआयटी टीम तातडीनं कामाला लागली आहे. त्यांनी सर्व प्रकरणातील संबंधितांची नव्यानं चौकशी सुरू केली असून आर्यन खानसह अनेकांना समन्स बजावलं आहे.
प्रायव्हेट आर्मीद्वारे समीर वानखेडे वसुली करत असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला होता. त्याबाबतचे अनेक पुरावे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी समोर आणल्यानंतर व खुद्द या प्रकरणातील साक्षीदारांनी समोर येऊन खंडणीचे आरोप केल्यानंतर एनसीबी वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. एनसीबीचे मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे यांचाच यामागे हात असल्याचा आरोप झाल्यामुळं एनसीबीनं त्यांच्याकडून ही प्रकरणं काढून घेतली आहेत. एनसीबीचे उपमहासंचालक संजय सिंह यांच्या अध्यक्षतेखालील एसआयटीनं हा तपास हाती घेतला आहे. यात आर्यन खान, समीर खान प्रकरणांसह अन्य चार प्रकरणं आहेत.
तपास हाती येताच एनसीबीच्या एसआयटी पथकानं संबंधित आरोपींना समन्स बजावणं सुरू केलं आहे. कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी आर्यनचा मित्र अरबाज मर्चंट व अचित कुमार याला आज एनसीबीच्या कार्यालयात बोलावण्यात आलं होतं. त्यानुसार ते आज चौकशीला सामोरे गेले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एसआयटीनं आर्यन खान यालाही आज बोलावलं होतं. मात्र, प्रकृतीच्या कारणास्तव त्यानं वेळ मागून घेतली आहे. तो सोमवारी चौकशीसाठी हजर राहण्याची शक्यता त्याच्या निकटवर्तीयांनी व्यक्त केली आहे.