दि.३०: NCB चे समीर वानखेडे यांनी कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज पार्टीवर कारवाई करत अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक केली होती. अखेर आर्यन खानला जामीन मिळाला. आर्यन खान ड्रग प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक हे वानखेडे यांच्यावर सातत्याने आरोप करत आहेत. वानखेडे यांनी केलेली कारवाईच बोगस असल्याचा दावा नवाब मलिक यांनी केला होता. आर्यन खान प्रकरणात भाजपाशी संबंधित लोकांचा कसा संबंध आहे, हे देखील समोर आणण्याचा प्रयत्न मलिक यांनी केला
बॉलीवूड कलाकारांना टार्गेट करून वानखेडे खंडणी मागत असल्याचा दावा नवाब मलिक यांनी केला होता. समीर वानखेडे यांनी धर्म परिवर्तन करून नोकरी मिळविल्याचा दावाही नवाब मलिक यांनी केला होता. नवाब मलिक हे एनसीबी भाजपाच्या इशाऱ्यावर काम करत असल्याचा आरोप केला होता.
हेही वाचा पॉवर स्टार पुनीत राजकुमार यांनी मृत्यूनंतरही ठेवला आदर्श कायम
आर्यन खानला जामीन मिळाल्यानंतर भाजपाचे माजी खासदार निलेश राणे यांनी नवाब मलिक यांच्यावर टीका केली आहे. माजी खासदार नीलेश राणे (Nilesh Rane) यांनी नवाब मलिक यांच्यावर ट्विटरच्या माध्यमातून जोरदार टीका केली आहे. मलिक यांच्यावर टीका करताना नीलेश राणे यांनी एकेरी भाषेचा वापर केला आहे. ‘आर्यनला जामीन मिळाला, रात्री नवाब सुखानं झोपला असेल. आर्यन मोठं युद्ध जिंकून आला, की त्यानं ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल मिळवलं? तरी तो सुटल्यानंतर काही मोजक्या तरुणांनी फटाके वाजवले, नवाब मलिकला अशीच पिढी घडवायची आहे,’ असा आरोप नीलेश राणे यांनी केला आहे. ‘हा माणूस महाराष्ट्र मंत्रिमंडळात कौशल्य विकास मंत्री आहे हे दुर्दैव आहे,’ असंही नीलेश राणे यांनी म्हटलं आहे.