मुख्यमंत्री पदाचा आणखी एक दावेदार, प्रभारी मुख्यमंत्री करण्याची मागणी

0

मुंबई,दि.24: महाराष्ट्रात (Maharashtra) महाविकास आघाडी सरकार पडणार अशी शक्यता आहे. राज्यात मागील काही दिवसांपासून राजकीय हालचाली वाढल्या आहेत. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड पुकारले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राजीनामा द्यावा लागल्याची शक्यता आहे. अशात एका शेतकऱ्याने आपल्याला मुख्यमंत्री करावे अशी मागणी केली आहे. राज्यातील सत्ता नाट्य संपेपर्यंत प्रभारी मुख्यमंत्री म्हणून आपल्याला नियुक्ती द्यावी अशी मागणी एका शेतकऱ्याने महाराष्ट्राच्या राज्यपालांकडे केलीय. यासंदर्भातील पत्रच या शेतकऱ्याने बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून पाठवलं आहे. इतकच नाही तर या पत्राच्या तळाशी या शेतकऱ्याने बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्याला मुख्यमंत्रीपदी नियुक्ती देण्यासंदर्भात विनंती करणारं हे पत्र तात्काळ राज्यापालांकडे पाठवावं, अशी विनंतीही केलीय.

श्रीकांत विष्णू गदळे या शेतकऱ्याने 22 जून रोजी बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मुख्यमंत्रीपदी नियुक्ती करण्याची मागणी करणारं पत्र सादर केलं आहे. तरी यासंदर्भातील माहिती गुरुवारी समोर आलीय. ‘चालू विधानसभेचा कार्यकाळ संपला असून, राज्यात घटनात्मक पेच प्रसंग निर्माण झाल्याने शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी प्रभारी मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती करावी’ असा पत्राचा विषय आहे.

पत्रात
उपरोक्त विषयानुसार विनंती अर्ज करतो की, मी शेतकरी पुत्र श्रीकांत विष्णू गदळे राहता दहिफळ (वडमाऊली) तालुका केज, जिल्हा बीडचा रहिवाशी आहे. मी १० ते १२ वर्षांपासून राजकारण आणि समाजकारणात अग्रेसर आहे. शेतकरी गोरगरिबांच्या प्रश्नांवर सातत्याने काम करत आहे. सध्या महाराष्ट्रात नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालं आहे. त्यामुळे येथील शेतकरी वर्ग चिंतेत सापडला आहे. अशावेळी सरकारने तात्काळ मदत करणे अपेक्षित होती. मात्र ती मिळाली नाही.

तरी आज मुख्यमंत्र्यांनी अडीच वर्ष सत्तेत राहून सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केलेले आहे. राज्यावर नैसर्गिक आपत्ती कोसळली अशताना सत्तेत राहून कोणत्याही प्रकारची मदत शेतकऱ्यांना, सर्वसामान्य नागरिकांना दिलेली नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना काळजीवाहू अथवा प्रभावी मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती न देता मला प्रभारी मुख्यमंत्री म्हणून संधी द्यावी.

मी जनतेचे सर्व प्रश्न मार्गी लावेन. बेरोजगारी, आत्महत्याग्रस्त शेतकरी, शेतमजूर, ऊतोड कामगार या सर्वांना न्याय देण्याचं काम मी करेन. विवाध प्रश्न सोडवण्यासाठी आपण तात्काळ माझी नियुक्ती करावी ही विनंती.

राज्याचे राज्यपाल माझ्या पत्राची दखल घेऊन मला प्रभारी मुख्यमंत्री म्हणून जनतेची सेवा करण्याची संधी देतील, असा विश्वासही गदळे यांनी व्यक्त केलाय.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here