मुंबई,दि.8: शिवसेनेचे 40 बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांच्या बरोबर गेले. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) मुख्यमंत्री झाले. ठाणे महापालिकेतील शिवसेनेच्या 67 नगरसेवकांपैकी 66 नगरसेवक शिंदे गटात सामिल झाले आहेत. शिवसेनेने राज्यात राष्ट्रवादी, काँग्रेस बरोबर सत्ता स्थापन केली होती. महाविकास आघाडीचे सरकार पडल्यानंतर राजकीय वातावरण बदलले आहे. काँग्रेसने मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शिवसेनेला आणखी एक धक्का बसला आहे.
मुंबई महापालिका निवडणूक मुंबई महापालिकेची आगामी निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार आहे अशी माहिती नाना पटोले यांनी दिली आहे. काँग्रेसने स्वबळावर निवडणूक लढवावी असे मत नाना पटोले यांनी याआधीही मांडले होते. महाराष्ट्रात राजकीय गणिते बदलली आहेत. त्यानुसार काँग्रेसनेही रणनीतीत बदल करण्याचे ठरविले आहे.
काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या पहिल्या क्रमांकांच्या उमेदवाराला मतदान न करणाऱ्या व विश्वासमताच्या वेळी हेतुपुरस्सर गैरहजर राहिलेल्या आमदारांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्याचे संकेत काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी दिले आहेत.
प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गुरुवारी काँग्रेसाध्यक्ष सोनिया गांधी यांना या संदर्भातील अहवाल सादर केला. या वेळी काँग्रेसचे नेते राहुल गांधी, काँग्रेसचे सरचिटणीस (संघटन) के. सी. वेणुगोपाल उपस्थित होते. 20 जूनला झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत चंद्रकांत हंडोरे पराभूत झाले हाेते. हंडोरे यांना पहिल्या पसंतीची मते न मिळाल्याने पराभव झाला. यासाठी काँग्रेसमधील काही आमदारांनी क्रॉस व्होटिंग केल्याची कबुली पटोले यांनी अहवालात दिल्याचे समजते.