मुंबई,दि.2: राम मंदिर सोहळ्यानंतर किंवा आधीही महाराष्ट्रात मोठी राजकीय घडामोड घडणार असल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी TV9 मराठीशी बोलताना केला आहे. महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस जानेवारी महिन्यात होण्याची शक्यता आहे. सगळ्या निवडणुकांच्या आधी हे होईल. काँग्रेसही फुटेल. असा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे.
भाजपा राज्यातील काँग्रेस पक्ष येणाऱ्या काळात फोडेल असा दावा दमानिया यांनी केला आहे. त्यामुळे विरोधी पक्षच उरणार नाही. त्यामुळे आमच्या सारख्यांनाच विरोधी पक्षाची भूमिका घ्यावी लागेल. लढावे लागेल. जो अमाप भ्रष्टाचार चालला आहे आणि भाजपा भ्रष्टाचारांना आपल्या पक्षात ओढून घेतंय ते बघून दु:ख होते. त्यामुळे आम्हाला वेदना होतात. हीच भाजपा भ्रष्टाचाराविरोधात लढायची का? असा सवाल त्यांनी विचारला आहे.
तसेच ज्या लोकांना राजकारणातून उचलून फेकून द्यायला हवे अशा लोकांना देवेंद्र फडणवीस मोठे करतायेत अशी माझ्या मनात शंका आहे. जरांगेबद्दल म्हटलं जाते की ते एकनाथ शिंदेंच्या सांगण्यावरून करतात तसं मीदेखील ऐकलं.परंतु मला तसं वाटत नाही. आज लढायचे झाले, तर कुणाविरोधातही लढले तरी त्यामागे बनावट कट रचला जातो. पूर्वी मी खडसेंविरोधात, सिंचन घोटाळ्याविरोधात लढले तेव्हा मी फडणवीसांसाठी लढतेय असं लोक म्हणायचे. पण आज मी फडणवीसांविरोधात लढले तर पुन्हा लोक तर्कवितर्क लावतात असा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केले आहे. टीव्ही ९ च्या मुलाखतीत त्यांनी हे विधान केले.