मुंबई,दि.१४: राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांची शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, मनसे प्रमुख राज ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्यासह सर्वपक्षीय शिष्टमंडळातील नेत्यांनी भेट घेतली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच होणार आहेत. राज्यातील सर्व महापालिका, नगरपरिषदा, जिल्हा परिषदा, पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पारदर्शक, निष्पक्ष पद्धतीने निवडणूका व्हाव्या यासाठी ही भेट घेण्यात आली व त्याबाबत निवडणूक आयोगाला निवेदन देण्यात आले.
मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांसोबतच्या या भेटीने नवीन राजकीय समीकरणाचे संकेत दिले आहेत. मराठीच्या मुद्द्यावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले. त्यावेळी उद्धव ठाकरे मविआ सोडणार का? अशी चर्चा सुरू झाली होती. पण, आता राज ठाकरेचं महाविकास आघाडीसोबत येण्याच्या दिशेने पावले पडत असल्याचे दिसत आहे.
आगामी पालिका निवडणुकीच्या धर्तीवर सध्या अनेक राजकीय समीकरणं बदलत असतानाच तत्पूर्वी याच निवडणूक प्रक्रियेवर शंका असल्याने त्याबाबत चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळाने राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांची भेट घेतली.
सदर बैठकपर भेटीमध्ये राज ठाकरे यांनी आयुक्तांपुढे अनेक प्रश्न उपस्थित केले. जिथं, दोन दोन ठिकाणी मतदारांचे नाव कसं? वडिलांचं वय मुलाच्या वयापेक्षा कमी कसं? असे सवाल केले. तर, विधानसभा निवडणुकीआधी 18 नोव्हेंबरला आम्ही आयोगाला पत्र देत खोटे मतदार नोंदणी झाल्याची बाब अधोरेखित करत त्यावर कोणतीही कारवाई न झाल्याचा सूर आळवला. यावेळी शिष्टमंडळाकडून VVPAT उपलब्ध नाहीत, मग बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या अशी मागणीसुद्धा केली.








