मुंबई,दि.२५: Ajit Pawar On Shivsena-VBA Alliance: शिवसेना वंचित युतीबाबत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी वक्तव्य केलं आहे. शिवसेना वंचित (Shivsena-VBA Alliance) युती बाळासाहेबांच्या जयंतीदिनी (Balasaheb Jayanti) जाहीर करण्यात आली आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेबरोबर वंचितने युती केली हे माध्यमातून समजल्याचे अजित पवार यांनी मंगळवारी मुंबईत माध्यमांशी बोलताना सांगितले. यासंदर्भात मी आणि आमचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) ठाकरेंची (Uddhav Thackeray) भेट घेऊन चर्चा करू व त्यानंतर आमची भूमिका मांडू, असेही त्यांनी स्पष्ट केले.
…हा सर्वस्वी त्यांचा अधिकार आहे | Ajit Pawar On Shivsena-VBA Alliance
उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या कोट्यातून कुणाला मित्रपक्ष म्हणून सोबत घ्यायचे, हा सर्वस्वी त्यांचा अधिकार आहे, असे सांगून अजित पवार म्हणाले की, राजकारणात मागच्या निवडणुकीत कुणी जागा पाडल्या याला काही अर्थ नसतो. राजकारणात येणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आराखडे आखावे लागतात व राजकीय भूमिका मांडावी लागते. युती- आघाडी होते, त्यावेळी ‘मागचे झाले गेले गंगेला मिळाले’ असे समजून पुढे गेलो तरच योग्य गोष्टी घडतात.
महाविकास आघाडीत नाराजी नाट्य सुरू?
शिवसेना आणि वंचितच्या युतीची घोषणा झाल्यानंतर महाविकास आघाडीत नाराजी नाट्य सुरू झाल्याची चर्चा आहे. ही युती जाहीर करताना उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीतील घटक पक्षांशी चर्चा केली नसल्याचे अजित पवार यांच्या विधानावरून स्पष्ट झाले आहे.
प्रकाश आंबेडकर काय म्हणाले होते? | Prakash Ambedkar
युती जाहीर होण्यापूर्वी अनेकवेळा ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी यावर भाष्य केले होते. महापालिका निवडणुकीमध्ये आमची शिवसेनेशी युती झाली आहे. उद्धव ठाकरे यांनी युतीचा अंतिम निर्णय घ्यायचा आहे. मात्र, युती कधी जाहीर करायची, ते ठाकरे यांनी ठरवायचे आहे. ठाकरे यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घ्यायचे आहे. आपण एकत्र पत्रकार परिषद घेऊ, असेही त्यांनी सांगितल्याचे आबेडकर म्हणाले होते.