ताम्रपट घेऊन जन्माला कोणी आलं नाही, आताचे बसलेले सुद्धा नाही: अजित पवार

0

अहमदनगर,दि.७: राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं असून याबाबत भरपाई देण्याची मागणी विधानसभेत करणार असल्याचं राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी म्हटलं आहे. ते अहमदनगरमध्ये बोलत होते. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं असल्याची टीका शिंदे-फडणवीस सरकारवर अजित पवार यांनी केली. एका अडत व्यापाऱ्यानं कांदा शेतकऱ्याला दोन रुपयाचा चेक दिला म्हणून यांनी त्याचा परवाना निलंबित केला. तू दोन रुपयाचा धनादेश दिला आणि आमची बदनामी झाली म्हणून त्याला निलंबित करण्यात आलं, असं अजित पवार म्हणाले. 

आठ महिन्यांपूर्वी राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. यानंतर राज्यात एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झालं. सरकार स्थापन होताच महाविकास आघाडीतील कामांना सरकारने स्थगिती लावली. यावरून विरोधकांनी सातत्याने सरकारवर टीकास्र डागलं आहे. आता अजित पवार यांनीही सरकारचा समाचार घेत हा कोणता न्याय आहे, असा सवाल उपस्थित केला आहे.

प्रत्येक आमदाराला आज सांगितलं जात आहे की… अजित पवार

राज्य मंत्रिमंडळाच्या रखडलेल्या विस्तारावरुनही अजित पवार यांनी सत्ताधाऱ्यांना चांगलंच सुनावलं. प्रत्येक आमदाराला आज सांगितलं जात आहे की तुला मंत्री करणार, पण मंत्रिमंडळ विस्तार काही अद्याप केला गेलेला नाही. असं झालं तर आमदार निघून जातील, असा इशारा अजित पवार यांनी शिंदे-फडणवीसांना दिला आहे. 

अहमदनगरमधील पाथर्डीत बोलताना अजित पवार म्हणाले, “उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आणि मी उपमुख्यमंत्री झाल्यावर आमदारांचा निधी पहिल्या वर्षी तीन कोटी, दुसऱ्या वर्षी चार कोटी आणि मागील वर्षी पाच कोटी केला. भाजपाच्याही आमदाराला ५ कोटी, कर्जत-जामखेडचा आमदार आणि श्रीगोंद्याच्याही आमदाराला ५ कोटी रुपये मिळाले. जनतेचे प्रश्न सुटण्यासाठी डीपीडीसीचे पैसे कमी न करता जास्तीचा निधी दिला.”

“एका मंत्र्याकडे सहा जिल्ह्यांचं पालकत्व आहे. ४० ते ५० कोटी रुपये जाहिरातीवर खर्च केले जात आहेत. मुंबईत तर १७ कोटी रुपये जाहिरासाठी खर्च केले गेले. सगळीकडं यांच्याच जाहिराती आणि यांचेच फोटो. एक डबळी एसटी दिसली त्याखालीही या दोघांचेच फोटो. असे फोटो शोभतात तरी का?”, असा टोला अजित पवार यांनी यावेळी लगावला. 

कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झालेला असताना आता अवकाळी पावसानं कापूर, हरभऱ्याचीही अशीच अवस्था झाली आहे. दिल्लीत कांद्याचे भाव कमी-जास्त झाले होते त्यामुळे दिल्लीचे सरकार गेले होते. जनतेनं मनात आणलं तर हेही सरकार पडू शकतं, असंही अजित पवार म्हणाले. 

जनतेच्या मनात येईल तेव्हा…

“पण, ह्यांच सरकार आल्यावर आमच्या काळातील कामांना स्थगिती दिली. तिथे माणसं राहत नाहीत का? आमचेही कामं करा, तुम्हीही नवीन कामं करा. जास्तीची कामं झालं म्हणून काय होतं. परंतु, हा कसला रडीचा डाव खेळता. पाच-पाच लाख लोकसंख्येच प्रतिनिधीत्व करणाऱ्या आमदारांनी कामं तुम्ही थांबवता हा कोणता न्याय आहे. सरकार बदलत असतात. ताम्रपट घेऊन जन्माला कोणी आलं नाही. आताचे बसलेले सुद्धा नाही. जनतेच्या मनात येईल तेव्हा बदल करते,” असा इशारा अजित पवारांनी सरकारला दिला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here