पुणे,दि.२६: Ajit Pawar: भाजपा नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी राज्य सरकारवर टीका केली होती. किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर निशाणा साधला होता. पत्रकार विचारतात आता कुणाचा नंबर, पण त्यासाठी चिट्ठी काढावी लागेल. ही चिट्ठी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी काढावी, असा टोला किरीट सोमय्या यांनी लगावला होता. किरीट सोमय्या यांनी ट्विट करून नेत्यांची नावे जाहीर केली होती. या यादीत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचेही नाव होते.
पुण्यातील विकासकामांचा आढावा घेत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अशाच एका आरोपाबद्दल विचारलं असता ते संतापले आणि ‘तुरुंगात जाऊ का?’ असा प्रतिप्रश्न त्यांनी पत्रकाराला केला. अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडीनं अटक केल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत सोमय्या यांनी महाविकास आघाडीतील इतर नेत्यांवरही हल्ला केला होता. ठाकरे सरकारमधील ‘डर्टी डझन’ची यादी आपल्याकडं तयार आहे. त्यात अजित पवार यांचंही नाव आहे. अजित पवार लवकरच तुरुंगात जातील असं सोमय्या यांनी म्हटलं होतं.
किरीट सोमय्या यांच्या या वक्तव्याकडं अजित पवार यांचं लक्ष वेधलं असता ते भडकले. ‘मग काय करू, तुरुंगात जाऊ का? असा प्रश्न त्यांनी केला. ‘मला यावर काहीही बोलायचं नाही. नो कमेन्ट्स! मी विकासकामाला महत्त्व देतो. कायद्यानं, नियमानं जे काही व्हायचं असेल ते प्रत्येकाच्या बाबतीत घडेल, असं ते म्हणाले. पत्रकारांनाही विकासकामांपेक्षा याच गोष्टीत जास्त रस असल्याचा त्रागा त्यांनी व्यक्त केला. त्यावर लोकांना हेच आवडतं असं एका पत्रकारानं सांगितलं. त्यावरही अजित पवार यांनी उत्तर दिलं. ‘फार कमी लोकांना अशा गोष्टींमध्ये रस असतो. लोकांना विकास हवा असतो. ते पाहूनच लोक संधी देतात. ज्यावेळी मोदी साहेब इथं आले, तेव्हा त्यांनीही विकासाच्या मुद्द्यावर लोकांचं मन जिंकलं ही फॅक्ट आहे, असं ते म्हणाले.