Accident: वऱ्हाड्यांची गाडी दरीत कोसळून 14 जणांचा मृत्यू, लग्न सोहळा आटपून येत होते परत

0

चम्पावत,दि.22: भीषण अपघातात (Accident) 14 जणांचा मृत्यू झाला आहे. लग्नसोहळा आटपून घरी परतणाऱ्या वऱ्हाड्यांच्या गाडीला भीषण अपघात (Accident) झाला आहे. गाडी दरीत कोसळल्याने तब्बल 14 जणांचा मृत्यू झाला आहे. उत्तराखंडमधील टनकपूर-चम्पावत महामार्गावरील सुखीढांग-डांडामीनार मार्गावर ही दुर्घटना घडली आहे. सोमवारी रात्रीच्या सुमारास हा अपघात झाला आहे.

अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी तात्काळ ग्रामस्थ आणि पोलिसांच्या मदतीने मदत-बचावकार्य सुरू करण्यात आले. या अपघातात 14 जणांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत 13 मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात आले आहेत. अद्यापही घटनास्थळावर मदत आणि बचावकार्य सुरू आहे. गाडी खोल दरीत कोसळल्याने मृतदेहांची ओळख पटवण्यातही अडचण येत आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मॅक्स वाहन क्रमांक (यूके टीए 4712) या गाडीचा अपघात झाला आहे. या गाडीतून सर्व प्रवासी टनकपूर येथील पंचमुखी धरमशाला येथे लग्न सोहळा आटपून आपल्या घराकडे परतत होते. त्यावेळी रात्रीच्या सुमारास हा अपघात झाला. रात्री जवळपास 3 वाजण्याच्या सुमारास अपघात झाला असल्याची माहिती समोर येत आहे. चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला असावा असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.

अपघातात मृत्यूमुखी पडलेले सर्व नागरिक हे ककनई येथील निवासी लक्ष्मण सिंह यांचा मुलगा मनोज सिंह याच्या लग्नसोहळ्यासाठी गेले होते. हा लग्नसोहळा आटपून सर्व नागरिक घरी परतत होते. मृतकांपैकी बहुतांश हे लक्ष्मण सिंह यांचे नातेवाईक असल्याची माहिती समोर आली आहे.



13 जणांचे मृतदेह पोलिसांनी दरीतून बाहेर काढले आहेत. सर्व 13 जणांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे. मृतकांमध्ये चार महिला, एक पाच वर्षांची मुलीचा समावेश आहे. या अपघातात गाडी चालक गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here