ज्यांना अक्कल नाही तेही टीव्हीसमोर येऊन नक्कल करतात: अब्दुल सत्तार

0

मुंबई,दि.16: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटातील आमदार अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी वृत्तवाहिनीवर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्तुती केली. तर शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर टीका केली. जगातल्या कोणत्याही राज्यात मुख्यमंत्री होणार नाही, असा मुख्यमंत्री आपल्याला लाभला आहे. आपण कोणतीही गोष्ट लपवून करत नाही.

माझ्या मतदारसंघात हिंदू मतदारांची लोकसंख्या जास्त आहे, पण मला ते निवडून देतात. आपली शिवसेना ओरिजनल आहे आणि जुन्या शिवसेनेचा कोणताही वाण आला तर शिंदेच्या बाणापुढे टिकू शकणार नाही, अशा शब्दांत आमदार अब्दुल सत्तार यांनी एकनाथ शिंदेवर स्तुतीसुमने उधळली. त्यासोबतच, माझ्या नावातच सत्ता असल्याचे सांगित मंत्रीपदाबाबतही भाष्य केलं. 

राजकारणात सत्ता येत असते, जात असते. माझ्या नावातच सत्ता आहे, फक्त र बाजूला काढलं तर काय राहते. भाजपात जात होतो, इकडे आलो सत्तेतच. काँग्रेसमध्ये होतो तेव्हाही सत्तेत होतो. आताही सत्तेत आहे, ईश्वर, अल्लाह आणि लोकांच्या आशीर्वादाने मी सत्तेत असतो, असे अब्दुल सत्तार यांनी म्हटले. तसेच, केवळ सिल्लोड मतदारसंघाचा विकास हे ध्येय बाळगूनच मी पुढे जातोय, असेही ते म्हणाले.

मी तीनवेळा मंत्रीपदी राहिलो आहे, त्यामुळे मंत्रीपदाची एवढी उत्सुकता नाही. मात्र, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना वाटलं की, अब्दुल सत्तार लोकांसाठी काम करतोय, ग्रामीण जनतेची कामं करतोय, तळगाळातील लोकांना न्याय देतोय, तर ते मला फोन करतील. ज्यांना मुख्यमंत्र्यांचा फोन येईल ते मंत्री होतील, असेही सत्तार यांनी एका वृत्तवाहिनीवर बोलताना सांगितले. 

शिवसेनेच्या शिंदे गटाच्या आमदारांकडून मुंबईतील रविंद्र नाट्य मंदिर येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शिंदे सरकार स्थापन झाल्यावर आमच्या मतदारसंघाला निधी मिळाला. शिंदे यांनी रात्री दोन वाजता माझ्या नगरपालिकेसाठी 20 कोटींचा निधी मंजूर केला आहे. त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांना पेन चालवण्यामध्ये अडचणी होत्या, पण आता ती अडचण शिंदे यांनी सोडवली आहे. त्यांच्या उपकाराची परतफेड आम्ही करू शकत नाही, असे अब्दुल सत्तार म्हणाले.

ज्यांना अक्कल नाही तेही टीव्हीसमोर येऊन नक्कल करतात. एकनाथ शिंदे यांनी एक आदेश दिला असता तर हे लोक राज्यसभेतही पोहोचू शकले नसते, असा टोलाही अब्दुल सत्तार यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना लगावला. आम्ही इमानदार राहिलो आणि शिवसेनेचे विधानपरिषद उमेदवार निवडून दिले. आम्ही दगाफटका केला नाही. पण शिंदे साहेबांनी जो निर्णय घेतला, तो बाळासाहेबांच्या राजकाराणातून आणि त्यांच्या विचाराचा वारसा पुढे चालवण्यासाठी घेतला, असे उद्गार अब्दुल सत्तार यांनी काढले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here