औरंगाबाद,दि.४: Abdul Sattar On BJP Shivsena Alliance: शिवसेनेने भारतीय जनता पार्टीेशी फारकत घेत राज्यात राष्ट्रवादी (NCP) व काँग्रेस (Congress) पक्षाशी युती करत सत्ता स्थापन केली. त्यानंतर अनेकवेळा भाजपा शिवसेना एकत्र येऊन सरकार स्थापन करतील असे भाकीत अनेकांनी वर्तविले. आता शिवसेनेचे नेते तथा मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी पुन्हा तसे संकेत दिले आहेत.
भाजप-शिवसेना युतीचा (BJP Shivsena Alliance) पूल केवळ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) हेच बांधू शकतात, असं वक्तव्य शिवसेना नेते आणि राज्य सरकारमधील मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी केलं आहे.
नितीन गडकरी हे देशाचे नेते आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याशी बोलून ते भाजप आणि शिवसेनेचं मनोमिलन घडवू शकतात, असं म्हणत अब्दुल सत्तार यांनी शिवसेना भाजप युतीचे संकेत दिले.
उद्धव ठाकरे हे राज्यातील कर्तव्यदक्ष राजकारणी आहेत. महाराष्ट्राचे नेतृत्व ते उत्तम प्रकारे करत आहेत. तर नितीन गडकरी हे महाराष्ट्राचेच नाही तर देशाचे नेते आहेत. त्यांनी ठरवलं तर शिवसेना-भाजप युतीचा पूल ते बांधू शकतात, असं अब्दुल सत्तार म्हणाले. ते एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलत होते.
अब्दुल सत्तार म्हणाले, “नितीन गडकरी देशाच्या राजकारणातलं एक चालतं-बोलतं विद्यापीठ आहे. गडकरीसाहेब हे महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचे नेते आहेत. त्यांनी एकदा ठरवलं की कुठंही कसाही पूल ते बांधू शकतात. पूल कसा बांधायचा, कसा जोडायचा, त्यासाठी काय काय करायला हवं, हे त्यांना चांगलं माहिती आहे. देशात त्यांच्या नावाचा मोठा बोलबाला आहे”.
“भाजप-शिवसेना युतीचा पूल जोडायचं त्यांनी मनावर घेतलं तर ते उद्धव साहेब ठाकरे यांच्याकडे जातील, त्यांना विनंती करतील. कारण शेवटी भाजप सेना युतीचा निर्णय उद्धवसाहेबच घेऊ शकतात”, असं अब्दुल सत्तार म्हणाले.
रश्मी ठाकरे यांच्याबद्दल अब्दुल सत्तार यांचं मोठं वक्तव्य
यावेळी त्यांनी मिसेस मुख्यमंत्री रश्मी ठाकरे यांच्याबद्दलही मोठं वक्तव्य केलं. “रश्मी ठाकरे या उत्तमप्रकारे मुख्यमंत्रीपद सांभाळू शकतात. रश्मीताईंची काम करण्याची पद्धत एक अभ्यासू महिला म्हणून आहे. आज त्या पदड्याच्या मागे काम करत असतात. त्या पडद्याच्या पुढे नाहीत. पण त्यांना महाराष्ट्रातील राजकारण बऱ्यापैकी माहिती असतं.”