दि.२१: Aamir Khan On The Kashmir Files: विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) दिग्दर्शित द काश्मीर फाईल्स (The Kashmir Files) चित्रपट चर्चेत आहे. काश्मीरमधील पंडितांवर १९९० साली झालेल्या अत्याचारांसंदर्भातील कथानकावर हा चित्रपट आधारित आहे. एकीकडे प्रेक्षक आणि समीक्षक या चित्रपटाचं कौतुक करत आहेत. तर दुसरीकडे बॉलिवूडच्या अनेक मोठ्या कलाकारांनी यावर अद्याप मौन बाळगलं आहे. ज्याची जोरदार चर्चा होतेय एवढं सर्व झाल्यावरही बॉलिवूड गप्प का? असा सवालही केला जातोय. पण आता प्रसिद्ध अभिनेता आमिर खाननं (Aamir Khan) या चित्रपटावर अखेर मौन सोडलं आहे. चित्रपटाबाबत त्यानं दिलेल्या प्रतिक्रियेमुळे सध्या तो चर्चेतही आहे.
आमिर खाननं (Aamir Khan) एस एस राजामौली यांचा चित्रपट ‘आरआरआर’च्या प्रमोशन कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी त्याला ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटासंबंधी काही प्रश्न विचारण्यात आले. त्यावर आमिरनं त्या सर्वच प्रश्नांची उत्तरं दिली. तो म्हणाला, ‘मी हा चित्रपट नक्कीच पाहणार आहे. कारण ही घटना आपल्या देशाच्या इतिहासातील एक अशी घटना आहे. ज्यामुळे अनेकांच्या भावनांना ठेच पोहोचली आहे. ज्या घटनेनं अनेकांना दुःख दिलं आहे.’
आमिर पुढे म्हणाला, ‘काश्मीरमध्ये काश्मिरी पंडितांसोबत जे काही झालं ते खूपच दुःखद आहे. त्यामुळे या विषयावर एक चित्रपट तयार केला गेलाय जो प्रत्येक भारतीयाने बघायला हवा आणि प्रत्येक भारतीयाने हे लक्षात ठेवायला हवं की, एका व्यक्तीवर जेव्हा अत्याचार होतो तेव्हा हे सर्व कसं दिसतं. कसं वाटतं.’
आमिर म्हणाला, ‘या चित्रपटाने ज्यांना माणूसकीवर विश्वास आहे अशा प्रत्येक व्यक्तीच्या भावनांना स्पर्श केला आहे आणि हीच या चित्रपटाची सुंदरता आहे. मला आनंद आहे की चित्रपटाला एवढं यश मिळतंय, कौतुक होतंय. चित्रपटाने चांगली कमाई केली आहे. मी हा चित्रपट नक्कीच पाहणार आहे.’