दि.23: Nawab Malik: महाराष्ट्र सरकारचे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अटक करण्यात आली आहे. दाऊद इब्राहिम मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक झाल्यानंतर नवाब मलिक म्हणाले, ‘मला अटक झाली आहे, पण मी घाबरणार नाही. आम्ही लढू आणि जिंकू.
राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना ईडीनं अटक केल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थान वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि शरद पवार यांच्यामध्ये तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे. संध्याकाळी 6.30 वाजता ही बैठक पार पडणार आहे. मलिकांवरील अटकेच्या कारवाईमुळं सरकारच्या अडचणीत वाढ झाल्यानं या बैठकीत नवाब मलिकांवर राजीनामा देण्यासाठी दबाव वाढणार असून मोठा निर्णय होण्याची शक्यता वर्तविण्यात येतेय.
थोड्याच वेळात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) सिल्व्हर ओकवरती पोहोचणार असल्याचे समजते. इतर मंत्री ही सिल्व्हर ओक या ठिकाणी पोहोचत आहेत. तिथे राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची बैठक होईल. त्यानंतर शरद पवार आणि अजित पवार एकत्रित वर्षावर जातील.
तर नवाब मलिक यांना जामीन मिळू शकतो
मलिकांच्या ED अटकेनंतर सरकारी वकील उज्वल निकम यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना ईडी ने नुकतीच अटक केली आहे. या अटकेच्या पार्श्वभूमीवर विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी म्हटलंय की, ईडीच्या अधिकाऱ्यांना नवाब मलिक यांच्या विरोधात सकृत दर्शनी काय पुरावा आहे? हे न्यायालयाला पटवून द्यावे लागेल. आणि त्यानंतरच न्यायालय ईडी कस्टडी द्यावी अथवा नाही हे ठरवले जाईल, अर्थात तपास यंत्रणेने कोणत्या प्रकारचा पुरावा गोळा केला आहे. त्या पुराव्याच्या गुणवत्तेवर हे ED कस्टडी किंवा न्यायालयीन कस्टडी राहू शकते. न्यायालय कस्टडी मिळाली तर जामिनाचा मार्ग मोकळा होऊ शकतो, ED कस्टडी मिळाली तर मात्र काही दिवसा साठी इडी कस्टडी मध्ये त्यांना राहावे लागू शकते, असे निकम म्हणाले.