मुंबई, दि.२५: राज्यात सध्या थंडीचा कडाका (Cold Wave) जास्त आहे. तापमान कमी जास्त होत असले तरी थंडी मात्र कायम आहे. पुढच्या काही दिवसांमध्ये पारा (Cold Wave) आणखी खाली घसरणार असून थंडीची लाट येणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. देशातल्या तापमानात मोठी घट होणार असल्याचेही हवामान विभागाचे म्हणणे आहे. त्या दृष्टीने नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दिवसांत पाच पुढच्या उत्तर – पश्चिम आणि मध्य भारताच्या बहुतांश भागांमध्ये किमान तापमानात ३ ते ५ अंशांनी हळूहळू घट होण्याची शक्यता आहे. तर २५ आणि २६ जानेवारी रोजी उत्तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी थंडीची लाट येण्याची शक्यता आहे.
हवामानात अचानक मोठा बदल होऊन रविवारी राज्याच्या बहुतांश भागावर धूळ आणि धुक्याचे मळभ निर्माण झाले होते. वाढलेल्या आर्द्रतेतून धुके आणि धूळ वाढवणाऱ्या वेगवान वाऱ्याच्या एकत्रित परिणामाने ही स्थिती निर्माण झाल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले. उत्तर कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात ही स्थिती ठळकपणे जाणवली, तर सौराष्ट्राकडून धूलीकण घेऊन आलेल्या वाऱ्यांमुळे रविवारी मुंबईतल्या अनेक भागांत हवेचा दर्जा धोकादायक पातळीवर पोहोचला होता.