नवी दिल्ली,दि.१९: Corona Third Wave Study Report: भारतात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत (Corona Third Wave In India) रुग्ण संख्येत मोठी वाढ होत आहे. अनेक राज्यात निर्बंध लागू करण्यात आले आहेत. अनेक जिल्ह्यात रुग्ण संख्या कमी होत आहे. देशात तिसऱ्या लाटेचा उच्चांक अंदाजापेक्षा आधी होऊ शकतो असे नवीन अभ्यासातून माहिती समोर आली आहे. देशातील एकूण स्थितीचा विचार करता आधी व्यक्त करण्यात आलेल्या अंदाजापेक्षा आधी देशात तिसरी लाट पीक गाठू शकते. येत्या दोन ते तीन आठवड्यात सर्वाधिक रुग्णसंख्येची नोंद होऊ शकते, असा अंदाज एका ताज्या स्टडी रिपोर्टमध्ये व्यक्त करण्यात आला आहे.
एसबीआय रिसर्चने (SBI Research) हा स्टडी रिपोर्ट प्रसिद्ध केला असून यात काही महत्त्वाच्या बाबी नमूद करण्यात आल्या आहेत. देशातील १५ जिल्ह्यांमध्ये सध्या रुग्णसंख्येत मोठी घट पाहायला मिळत आहे. डिसेंबर महिन्यात या जिल्ह्यांत रुग्णसंख्येत ६७.९ टक्के इतकी वाढ झाली होती. हे प्रमाण जानेवारी महिन्यात ३७.४ टक्के इतके खाली आले आहे. या १५ जिल्ह्यांत १० प्रमुख शहरे असून यातील बेंगळुरू आणि पुणे या शहरांत अजूनही रुग्णवाढीचा दर अधिक आहे, असे या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. जानेवारी महिन्यात जी रुग्णवाढ होत आहे त्यात ३२.६ टक्के रुग्ण ग्रामीण भागातील आहेत.
हेच प्रमाण डिसेंबरमध्ये १४.४ टक्के होते, अशी महत्त्वाची बाबही रिपोर्टमध्ये अधोरेखित करण्यात आली आहे. अमेरिकेतील स्थितीची तुलना करता हे प्रमाण खूप कमी असून तो एक आशेचा किरण मानला दिसत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
भारतात लसपात्र लोकांपैकी ६४ टक्के लोकांनी लसचे दोन्ही डोस घेतले आहेत तर ८९ टक्के लोकांनी किमान एक डोस घेतला आहे. एकूण ४४ लाख बूस्टर डोस आणि ३.४५ कोटी डोस १५-१८ वयोगटातील मुलांना देण्यात आले आहेत. एकूण लसीकरणामध्ये ग्रामीण लसीकरणाचा वाटा आता जानेवारीमध्ये ८३ टक्के आहे, हे सूचित करते की सध्याच्या लाटेत ग्रामीण लोकसंख्येचे मोठ्या प्रमाणावर संरक्षण होऊ शकते, असे अहवालात म्हटले आहे.
तिसऱ्या लाटेबाबत महत्त्वाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. इतर जिल्ह्यांत कठोर उपाययोजना करण्यात आल्या आणि संसर्गाचा अधिक प्रसार रोखण्यात यश आलं तर कोरोनाची ही लाट येत्या दोन ते तीन आठवड्यांत देशपातळीवर उच्चांक गाठेल, अशी शक्यता एसबीआयचे मुख्य आर्थिक सल्लागार सौम्यकांती घोष यांनी अहवालात व्यक्त केली आहे.