Omicron Variant: ओमिक्रॉन व्हेरिएंट बद्दल डॉ. जयप्रकाश मुलियील यांचा सर्वात मोठा दावा

0

दि.१२: ओमिक्रॉन व्हेरिएंटचे (Omicron Variant) रुग्ण देशात आढळत आहेत. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. अशातच ओमिक्रॉन व्हेरिएंट बाबत भारताच्या प्रमुख तज्ज्ञांपैकी एक असलेल्या डॉ. जयप्रकाश मुलियील यांनी केला आहे. इन्स्टिट्युट ऑफ एपिडेमोलॉजीच्या वैज्ञानिक सल्लागार समितीचे प्रमुख डॉ. जयप्रकाश मुलियील यांनी ओमिक्रॉन आणि बूस्टर डोस याबाबत अत्यंत महत्त्वाचे मत मांडले आहे.

‘ओमिक्रॉनचा फैलाव अत्यंत वेगाने होत आहे. या विषाणूला रोखणे शक्य नाही. जवळपास प्रत्येकाला ओमिक्रॉनची लागण होणार आहे. आता जी रुग्णसंख्या आपल्याला दिसते आहे त्यापेक्षा ९० टक्के जास्त रुग्ण प्रत्यक्षात असू शकतात. तरीही घाबरण्याचे कोणतेही कारण नाही’, असे डॉ. जयप्रकाश मुलियील यांनी नमूद केले. कोरोना आता घातक आजार राहिलेला नाही. कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटची लक्षणे सौम्य आहेत. बहुतांश रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकताही भासत नाहीय. म्हणजेच कोरोनावर मात करणे आता शक्य झाले आहे, असे महत्त्वाचे निरीक्षणही डॉ. मुलियील यांनी नोंदवले.

“डेल्टा व्हेरिअंटच्या लाटेनंतर जे या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे, ती ओमिक्रॉनची आहे. ज्या प्रकारे तुम्ही याची चाचणी करा किंवा याची पुष्टी करा, परंतु या ठिकाणी याची पुष्टी करण्याची गरज नाही,” असं मत आयसीएमआरच्या नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ एपिडेमोलॉजीच्या वैज्ञानिक सल्लागार समितीचे प्रमुख डॉ. जयप्रकाश मुलियील यांनी व्यक्त केलं. ते एनडीटीव्हीशी बोलत होते.

ओमिक्रॉन हा एखाद्या साध्या तापासारखा आहे. ८० टक्के लोकांना तर या संसर्गाची लागण झाली तरी ते बाधित असल्याचे लक्षात येत नाही. त्यामुळे याबाबतची मनातली भीती दूर सारून या आजारासोबत जगायला आपण शिकले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. दुसऱ्या लाटेत डेल्टामुळे बाधित झालेल्या रुग्णांची नेमकी संख्या जाणून घ्यायची असेल तर जी नोंद रुग्णसंख्या आहे त्याला ३० ने गुणावे लागेल, असे नमूद करताना ज्या व्यक्तीमध्ये लक्षणे दिसत नाहीत त्याला लागण झाल्याचे कळतच नाही ही बाब ध्यानात घेतली पाहिजे असे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

कोविडवरील लस पुन्हा पुन्हा बूस्टर डोस म्हणून देण्यात काहीही अर्थ नाही. त्याऐवजी नव्या व्हेरिएंटला प्रतिबंध करू शकेल, अशा नव्या लसची निर्मिती होत असेल आणि ती लस दिली जाणार असेल तर ते अधिक योग्य ठरेल, असे मतही डॉ. मुलियील यांनी मांडले. कोणत्याही वैद्यकीय संस्थेने व सरकारच्या सल्लागारांनी बूस्टर डोस देण्याचा सल्ला दिलेला नाही. बूस्टर डोस महामारी रोखू शकत नाही हे वास्तव असून प्रीकॉशनरी डोस देण्याबाबत सरकारला सल्ला दिला गेलेला आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. ज्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे अशा वृद्ध व्यक्तींचा विचार करून हा सल्ला दिला गेला आहे, असेही ते म्हणाले.

कोरोना चाचणी

बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या व्यक्तीची कोरोना चाचणी करण्याची कोणतीही आवश्यकता नाही. नव्या व्हेरिएंटची रुग्णसंख्या दोन दिवसांत दुप्पट होत आहे. अशा स्थितीत रुग्णाच्या संपर्कातील प्रत्येकाची कोरोना चाचणी करण्याने काहीही साध्य होणार नाही. साथीचा फैलाव ज्या वेगाने होत आहे त्या वेगाने तुम्ही चाचण्या करू शकत नाही आणि त्याची आवश्यकताही नाही, असे मतही डॉ. मुलियील यांनी नोंदवले. ते एनडीटीव्हीशी बोलत होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here