Lockdown: तर महाराष्ट्रात संपूर्ण लॉकडाऊन लागू होईल : आरोग्यमंत्री राजेश टोपे

0

मुंबई,दि.२५: Lockdown: ओमिक्रॉन व्हेरीयंटची (Omicron Variant) रुग्णांची संख्या वाढत आहे. देशात वाढणाऱ्या रुग्णसंख्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने निर्बंध लावण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे महाराष्ट्रासह (Maharashtra) अनेक राज्यात नाईट कर्फ्यु लावण्यात आला आहे. तसेच अनेक निर्बंध लावण्यात आले आहेत. ओमिक्रॉन व्हेरीयंटची (Omicron Variant) रुग्ण संख्या वाढत राहिली तर राज्यात पुन्हा लॉकडाऊन (Lockdown) लावण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) या पार्श्वभूमीवर स्पष्टीकरण दिले आहे.

आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) म्हणाले यापूर्वीचा अनुभव पाहता राज्यात जेव्हा दररोज कोरोना (Corona) रुग्णांसाठी ८०० मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज लागेल, तेव्हा लॉकडाऊन (Lockdown) लावायचा, हे ठरले आहे. पण ओमिक्रॉनच्या संसर्गाच वेग हा प्रचंड आहे. त्यामुळे ऑक्सिजन वापराची मर्यादेचे निकष ५०० मॅट्रिक टनापर्यंत खाली आणण्याविषयी विचार सुरु आहे. त्यामुळे भविष्यात दररोज ५०० मॅट्रिक टन ऑक्सिजनची गरज भासू लागल्यास महाराष्ट्रात संपूर्ण लॉकडाऊन लागू होईल, अशी शक्यता राजेश टोपे यांनी वर्तविली.

महाराष्ट्रात काही दिवसांपूर्वी दिवसाला कोरोनाचे ६०० ते ७०० रुग्ण सापडत होते. आता हे प्रमाण १४०० पर्यंत पोहोचले आहे. यामध्ये ओमिक्रॉनबाधितांची संख्या ८० इतकी आहे. याचा अर्थ ओमिक्रॉनच्या रुग्णांनी जवळपास शंभरी गाठली आहे. आज हा आकडा कमी वाटत असला तरी जेव्हा ओमिक्रॉन बाधितांची संख्या हजारावर पोहोचेल, तेव्हा परिस्थिती खूपच अवघड होईल. कारण ओमायक्रॉनच्या प्रसाराचा वेग प्रचंड आहे.

परदेशात एका दिवसात ओमिक्रॉनच्या रुग्णांची संख्या दुप्पट होत आहे. क्षेत्रफळाच्यादृष्टीने महाराष्ट्राच्या निम्मा असलेल्या फ्रान्समध्ये दिवसाला ओमिक्रॉनचे एक-एक लाख रुग्ण सापडत आहेत. आपल्याकडेही आता ओमायक्रॉनचे बऱ्यापैकी रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे कोरोनाची तिसरी लाट आलीच तर ती ओमिक्रॉन व्हेरिएंटचीच असेल, असे टोपे यांनी सांगितले.

मात्र, ओमिक्रॉन रुग्णांवरील उपचारासाठी ऑक्सिजनची तितकीशी गरज लागत नाही. केवळ सहव्याधी असणाऱ्या आणि वृद्धांवर उपचार करताना ऑक्सिजनची गरज भासेल. त्यामुळे राज्य सरकार केवळ प्रतिबंधात्मक उपाययोजना करत आहे. आम्हाला निर्बंध लागण्याची इच्छा नाही. त्यामुळे प्रतिबंधक उपाययोजना लागू झाल्याचा कोणताही चुकीचा अर्थ काढू नये, असे आवाहनही राजेश टोपे यांनी केले. सध्या शाळा बंद करण्यासंदर्भात कोणताही निर्णय झालेला नाही. हॉटेल, रेस्टाँरंट ५० टक्के क्षमतेने सुरु राहतील. याठिकाणी एकाचवेळी खूप गर्दी होऊ नये, इतकाच उद्देश आहे. त्यामुळे नववर्षाच्या पूर्वसंध्येला गर्दी कमी राहण्यासाठी हॉटेल्स सुरु ठेवण्याची वेळ वाढवल्यास त्याला आमचा विरोध नसेल, असेही राजेश टोपे यांनी सांगितले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here