अहमदनगर,दि.२०: माजी माजी नगराध्यक्षांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. श्रीगोंदा नगर पालिकेच्या माजी नगराध्यक्षा श्यामला मनोज ताडे (वय ४०) यांनी आज पहाटे गळफास लावून घेत आत्महत्या केली. यामागील नेमके कारण स्पष्ट झाले नाही. मात्र, अलीकडे राजकारणात फारसे सक्रिय नसलेल्या ताडे यांनी कौटुंबिक कारणातून हे पाऊल उचललं असावं असा अंदाज आहे. पोलिसांकडून चौकशी सुरू असून जबाब नोंदविण्याचे काम सुरू आहे. त्यानंतरच यासंबंधी अधिक तपशील उघड होणार असल्याचे सांगण्यात आले.
सोमवारी पहाटे ताडे यांचा मृतदेह त्यांच्या घरात पंख्याला लटकल्याच्या अवस्थेत आढळून आला. त्यांनी साडीने गळफास लावून घेतल्याचे दिसून येत होते. दगडू ताडे यांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्याला यासंबंधी माहिती कळविली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. डॉक्टरांनी ताडे यांना मृत घोषित केले. त्यानंतर पुढील कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
पोलिस निरीक्षक रामराव ढिकले यांनी घटनास्थळी भेट दिली असून, पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. कुटुंबीयांकडून माहिती घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. दहा वर्षांपूर्वी ताडे या श्रीगोंद्याच्या अडीच वर्षे नगराध्यक्षा होत्या. त्यावेळी हे पद अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव होते. त्या आरक्षित जागेवर त्या निवडून आल्या होत्या. अलीकडे मात्र त्या किंवा त्यांचे पतीही शहराच्या राजकारणात फारसे सक्रिय नव्हते.