मुंबई,दि.१४: अहमदाबाद विमान अपघातानंतर (Ahmedabad Plane Crash) मुंबई विमानतळाच्या परिसरातील मांसविक्री बंद करण्याची मागणी करण्यात आली आहे. अहमदाबाद विमानतळ परिसरात १२ जून रोजी विमानाचा भीषण अपघात झाला. यात विमानातील २४२ जणांपैकी २४१ जणांचा मृत्यू झाला. यानंतर विमानाच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक खबरदारी घेतली जात आहे.
अहमदाबाद विमान अपघातानंतर विमानतळाच्या परिसरात उघड्यावर होणाऱ्या मटण-चिकन विक्रीच्या मुद्द्याकडे पर्यावरणप्रेमींनी पुन्हा लक्ष वेधले आहे. मांसाच्या तुकड्यांसाठी येथे पक्ष्यांचा वावर असून, ते विमानांना धडकण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे मांसविक्रीची दुकाने बंद केली जावी, या मागणीने पुन्हा जोर धरला आहे. ZEE 24 तासने याबाबत वृत्त दिले आहे.
या परिसरात कत्तल करण्यास मनाई
नवी मुंबई विमानतळ लवकरच कार्यान्वित होणार आहे. विमान कंपन्यांनी विमानतळ ऑपरेटरशी करार केले आहेत. सिडकोच्या अध्यक्षतेखाली एअरोड्रोम पर्यावरण देखरेख समिती नियुक्त करणाऱ्या महाराष्ट्र सरकारने आदेशात स्पष्टपणे नमूद केले आहे की विमानतळापासून 10 किमीच्या परिघात कत्तल करण्यास मनाई आहे. असे असतानाही उलवे परिसरात उघड्यावर होणाऱ्या कोंबड्या, बकरे यांच्या कत्तलीबाबत आणि विक्रीबाबत प्रशासनाने काहीच भूमिका घेतली नसल्याने पर्यावरणप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे. उलवे हा भाग सिडकोकडे आहे आणि तरीही त्यांनी यावर कोणतीही कारवाई केलेली नाही. अहमदाबादला झालेल्या अपघातानंतर या मुद्द्याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली आहे.
भारतीय विमानतळ प्राधिकरणद्वारे (एएआय) व्यवस्थापित एरोनॉटिकल इन्फॉर्मेशन सर्व्हिसने (एआयएस) नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या परिचालनाच्या तयारीशी संबंधित नोटिस टू एअरमन – यादी जारी केली आहे. परंतु, उलवेतील तीन किमीच्या परिघात बेकायदेशीर कत्तलीशी संबंधित मुद्दा या यादीतून गायब आहे. याबाबत पर्यावरणप्रेमींनी आश्चर्य व्यक्त केले आहे.