पुणे,दि.7: पेपर जेव्हा लीक होतात, त्यावेळी परीक्षा कॅन्सल होते. पुन्हा परीक्षा घेतली जाते, असे उदाहरण देत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्यात अशी मागणी केली आहे. त्या पुण्यात माध्यमांशी बोलत होत्या. सोलापूर जिल्ह्यातील मारकवाडी येथील गावकऱ्यांनी ईव्हीएम मशीनवर संशय व्यक्त करत 3 डिसेंबरला बॅलेट पेपवर मतदान घेण्याची तयारी केली होती. मात्र प्रशासनाकडून परवानगी नाकारण्यात आली. यावरून सुळे यांनी सरकारवर टीका केली.
काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
जर एखाद्या गोष्टीमध्य संभ्रम असेल म्हणजे आता पेपर जेव्हा लीक होतात, त्यावेळी परीक्षा कॅन्सल होते. ईव्हीएम विरोधात लोकांमध्ये असंतोष पसरला आहे. त्यामुळे बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्यात, हीच आमची मागणी आहे. एखादी गोष्टी जर पारदर्शक करता येत असेल आणि जगातही बदल झालेला आहे तर आपणही करावा, एवढीच मागणी आहे. एकदा जर बॅलेट पेपरवर मतदान घेतलं तर ईव्हीएमचा कुठलाही प्रश्न येत नाहीत. आणि जगात हा बदल होत असेल तर आपल्याला करायला काय अडचण आहे? असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
एखादी प्रक्रिया आणि ती प्रक्रिया निवडणूक आयोग थांबवत नाही तर सरकार थांबवतंय. एखाद्या गावाला एखादी अॅक्टिव्हिटी करायची असेल, एखादी ड्रील घ्यायची असेल तर त्याच्यात गुन्हा कसा असेल? आणि तिही संविधानच्या चौकटीतील अॅक्टिव्हिटी आहे ना? शरद पवार आणि जयंत पाटील हे उद्या मारकडवाडीला जाणार आहेत, अशी माहिती सुप्रिया सुळे यांनी दिली.
सर्वांचा ईव्हीएमला तीव्र विरोध आहे. सुप्रिम कोर्टात ईव्हीएम विरोधात जाण्याबाबत सोमवारी आम्ही निर्णय घेऊ. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बॅलेटवर घ्याव्यात अशी आमची मागणी आहे. पुढच्या पंधरा दिवसांत सगळ्यांशी चर्चा करू आणि मतं जाणून घेऊ. असे सुळे म्हणाल्या.