“भाजपा हा कचरा जमाव पक्ष झालाय” उध्दव ठाकरे

0

मुंबई,दि.18: बीकेसी मैदान मुंबईत महाविकास आघाडीची महासभा झाली. यावेळी शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर सडकून टीका केली. हिंदुस्थानातील हुकूमशाही शक्तींविरुध्द देशात परिवर्तनाची लाट निर्माण झाली आहे. त्याची प्रचिती आजच्या महाविकास आघाडीच्या सभेने दिली. या सभेला अभूतपूर्व गर्दी झाली होती. महाविकास आघाडीच्या विजयाची नांदी देणारी ही विराट जनसभा आहे अशी सुरूवात करत उद्धव ठाकरे यांनी सभेला संबोधित केले.

भाजपा हा कचरा जमाव पक्ष झालाय

निसर्गाचा नियम आहे. ऋतू येतात ऋतू बदलतात. पाने उगवतात आणि सडतात. सडलेली पाने झडलीच पाहिजेत. तोपर्यंत नवीन अंकुर फुटत नाही. शिवसेना या वृक्षाने सडलेली पाने टाकून दिली आणि कचरा गोळा करणाऱ्या गाडीवाल्याने ती भाजपच्या गळय़ात टाकली आहेत, असा घणाघात करतानाच, भाजपा हा कचरा जमाव पक्ष झालाय, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. भाजपा हा भाडोत्री आहे, भाकड आहे, भेकड आहेच पण कमळाबाई आहेच आहे, अशी खिल्लीही उध्दव ठाकरेंनी उडवली.

…की मोदींचे लाचार व्हायला पाहिजे

ही लढाई आम्ही व्यासपीठावर जमलो त्यांची नाही. ही लढाई तुमची आहे. तुम्ही ठरवायला पाहिजे की, तुमचे भविष्य काय असणार आहे. तुम्हाला स्वातंत्र्य पाहिजे की गुलामी पाहिजे… तुम्हाला सगळं मोकळं पाहिजे, बोलण्याचा अधिकार पाहिजे, तुमचे तुम्हीच स्वामी व्हायला पाहिजे की मोदींचे लाचार व्हायला पाहिजे हे तुमचं तुम्हाला ठरवायचं आहे आणि मला खात्री आहे ज्या तळमळीने मी तुमच्याशी बोलतो आहे कोरोना काळामध्ये मी जे जे बोललो ते तुम्ही ऐकलं कोरोना व्हायरसपासून म्हणूनच आपण वाचलो. तसंच आता या हुकूमशहाच्या व्हायरसपासून देशाला वाचवण्यासाठी हिंमत करून फक्त एका बोटाने या हुकूमशहाला गाडून टाका, अशी साद उद्धव ठाकरे यांनी घातली.

तसे मोदी फक्त मोदी म्हणून राहतील

मोदींनी अचानक रात्री आठ वाजता टीव्हीवर येऊन नोटबंदी जाहीर केली होती आणि देशाला फसवले होते. तुमच्याकडच्या चलनी नोटा आज रात्री 12 वाजल्यानंतर केवळ कागदी तुकडे राहतील. त्यांचे चलनी महत्त्व 12 नंतर रद्द करण्यात आले आहे. त्याला डिमोनिटायझेशन म्हणतात. आता 4 जूनला संपूर्ण देश डिमोदीनेशन करणार आहे. चलनी नोटा जसे कागदाचे तुकडे राहिले होते तसे मोदी फक्त मोदी म्हणून राहतील, देशाचे पंतप्रधान राहणार नाहीत, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

मुस्लिमांना देशद्रोही ठरवतात

दरवेळेला निवडणूक आल्यानंतर मोदी हिंदू-मुस्लिम करतात आणि आता तर महाविकास आघाडीसोबत मुस्लिम बांधव येत असल्याने मोदींच्या पोटात दुखतेय, असे ठाकरे म्हणाले.  हिंदू-मुस्लिम भेदभाव करेन तेव्हा राजकीय जीवनाचा त्याग करेन असे परवाच्या मुलाखतीत मोदी म्हणाले. खरंतर त्यांनी तसा त्याग कधीच करायला हवा होता. मोदी मुस्लिमांना देशद्रोही ठरवतात, घुसखोर म्हणतात आणि दावा करतात की, हिंदू मुस्लिम भेदभाव करत नाही. मग काय आम्ही करतो? असे उद्धव ठाकरे म्हणाले. माझे बालपण मुस्लिमांसोबत गेले. अडोसपडोस मुस्लिम रहायचे. मीसुध्दा ताजियाखालून गेलेलो आहे. ईदच्या दिवशी आमच्या घरी जेवण बनत नव्हते. मुस्लिम कुटुंबियांकडून जेवण येत होते, असे मोदी मुलाखतीत म्हणाले. मग काहीतरी खाल्ल्यामीठाची जाण ठेवा, असा खोचक सल्लाही उद्धव ठाकरे यांनी दिला. मुस्लिमांकडून जेवण येत होते तर त्याचा मेनूपण सांगा आणि तुम्ही तो खाल्ला होता का नव्हता? मग अमित शहांनाही सांगा  तुम्ही काय खाल्ले होते ते? अशी खिल्लीही त्यांनी उडवली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here