मुंबई,दि.23: फोन टॅपिंग प्रकरणात फडणवीस गुन्हेगार होते म्हणूनच आपल्याला अटक होईल अशी भीती फडणवीसांच्या मनात होती असे शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. फोन टॅपिंग प्रकरणाची महाविकास आघाडी सरकारने चौकशी सुरू केली होती. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील सरकारने या प्रकरणाचा तपास सुरु केला होता म्हणून फडणवीसांना अटकेची भीती वाटत होती, असा दावा राऊत यांनी केला आहे.
“एकनाथ शिंदेंचे आताचे बॅास नरेंद्र मोदी, अमित शाहा यांचं म्हणणं आहे की, सरकार कारण नसताना कोणाला अटक करत नाही. आरोपी कितीही मोठा असो कायद्यासमोर सर्व समान असतात. म्हणून तर मोदींच्या सरकारने झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना अटक केली. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली. अनेक मंत्र्यांना, आमदारांना आणि खासदारांना अटक केली. का अटक केली? त्यांच्याशी संलग्न काही ना काही आरोप जोडण्यात आले,” असं राऊत म्हणाले.
देवेंद्र फडणवीस यांच्या मनात भिती होती की…
“उद्धव ठाकरेंचे सरकार फडणवीसांना अटक करत होते, आशिष शेलारांना अटक करत होते. का करत होते तर त्यांनी काही ना काही केलं असेल ना? काही कारण नसताना कोणी कोणाला अटक करतं का?” असा सवाल राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना उपस्थित केला. “बेकायदेशीर फोन टॅपिंग प्रकरणात फडणवीस गुन्हेगार होते. बेकायदेशीर फोन टॅपिंग प्रकरणाचा तपास सुरु होता. त्यांना भीती होती की त्यांना अटक केली जाईल. माझ्याकडे काही माहिती आहे, सूचना आहे असं काही नव्हतं पण त्यांच्या मनात भिती होती की त्यांनी खूप मोठा गुन्हा केला आहे. मुख्यमंत्री, गृहमंत्री असताना विरोधीपक्षांच्या नेत्यांचे फोन मी ऐकले आहेत. त्यासाठी मी दोन अधिकारी नियुक्त केले होते, अशी भिती त्यांच्या मनात होती,” असं राऊत म्हणाले.