राजकारण्यांच्या नादी लागून स्वत:चं नुकसान करून घेऊ नका, एसटी कर्मचाऱ्यांना अनिल परब यांचे आवाहन

0

मुंबई,दि.12: एसटी कर्मचारी त्यांच्या मागण्यांसाठी संपावर आहेत. एसटी कर्मचाऱ्यांची सरकार मध्ये विलिनीकरणाची मागणी आहे. ऐन दिवाळीत एसटी कर्मचाऱ्यांनी संप केल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. आम्ही तुमच्या विरोधात नाही. तुमचे प्रश्न सुटावेत हाच आमचा प्रश्न आहे. त्यामुळे तुम्ही कामावर या. राजकारण्यांच्या नादी लागून स्वत:चं नुकसान करून घेऊ नका, असं आवाहन करतानाच एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न उच्च न्यायालयातूनच सोडवला जाईल, असं परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितलं.

परिवहन मंत्री अनिल परब यांनी माध्यमांशी संवाद साधून पुन्हा एकदा कामगारांना कामावर येण्याचं आवाहन केलं आहे. एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलनीकरण करण्यासाठी कोर्टाने एक समिती स्थापन केली आहे. या समितीला कोर्टाने 12 आठवड्यांचा वेळ दिला आहे. अभ्यासासाठी दोन चार दिवस लागत नाही. त्यासाठी वेळ लागतो. विलनीकरणाचे दूरगामी परिणाम काय होतील? आर्थिक बोझा किती पडेल? याचा अभ्यास करावा लागणार आहे. सर्व गोष्टींचा अभ्यास करून त्याचा निर्णय घ्यावा लागतो.

हायकोर्टाने विचार करून कालावधी दिला आहे. आम्ही दिला नाही. तोच एक पर्याय आहे. त्या मार्गाचाच अवलंब करावा लागेल. हा विषय उच्च न्यायालयातूनच सोडवला जाईल, असं परब यांनी स्पष्ट केलं. या समितीसमोर जावून कर्मचाऱ्यांनी आणि त्यांच्या नेत्यांनी म्हणणं मांडावं. जो अहवाल येईल तो आम्हाला मान्य असेल. तुम्ही कामावर जा. कामावर गेले तर नुकसान होणार नाही. पण कामावर न गेल्यास नुकसान होईल. राजकीय लोकं आपल्या पोळ्या भाजून घेतील. तुमचं नुकसान कुणी भरून देणार नाही. नंतर ते तुम्हाला वाऱ्यावर सोडून देतील, असंही ते म्हणाले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here