“आमच्या मराठ्याच्या नेत्यांना तुम्हाला पाडणे शक्यच नाही” मनोज जरांगे पाटील

0

सांगली,दि.17: ओबीसी नेते, मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांचे नाव न घेता जालना येथील ओबीसी एल्गार सभेत टीका केली होती. आता मराठा समाजाचा नवा नेता निर्माण झाला आहे. धनगर, तेली, माळी यांना नंतर ओबीसीमध्ये घुसवले असे तो म्हणतोय. पण आरक्षण म्हणजे काय ते तर समजून घ्या. आरक्षण हा गरीबी हटाव कार्यक्रम नाही. आम्हाला घटनेने, संविधानाने, बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण दिले आहे. आमच्या हक्काचे खातो म्हणतोय, अरे तुझे खातो का? आम्ही सासऱ्याच्या घरी तुकडे मोडत नाहीत, दगडाला शेंदरू लावून हा कुठला तुमचा देव झाला? अशी घणाघाती टीका छगन भुजबळ यांनी केली होती.

छगन भुजबळ यांनी केलेल्या टीकेला मनोज जरांगे यांनी प्रतिउत्तर दिले आहे. मराठा समाजाने आता ठरवले आहे, आम्ही त्यांच्या टीकेला उत्तर देणार नाही. त्यांना तेच काम उरले आहे. लोकांचे खाल्ल्याने ते आतमध्ये जाऊन आले आहेत. कोण कुणाचे खात आहे सर्वांना माहित आहे. त्यामुळे त्यांनी यावर बोलू नाहीत. तुम्ही टीका केली तर, तुम्हाला उत्तर देण्यासाठी आम्ही कच्चे नाहीत. या राज्यात आम्ही वातावरण खराब होऊ देणार नाही. आता आम्ही देखील 50 टक्के आहे. लोकांचे पैसे खाता, रक्त पिता का? मग तुम्हाला कोण देव मानणार आहे. वयाने तुम्ही मोठे आहेत. आम्हाला काढायला लावू नयेत. आम्ही देखील तुमचा बायोडेटा काढला आहे. धमक्या देऊ नयेत, असे जरांगे म्हणाले.

टीका करण्याचं कामच त्यांना आहे. त्यामुळे त्यांना महत्त्व द्यायचं नाही असं आम्ही ठरवलं आहे. त्यामुळे यापुढे त्यांना महत्त्व देणार नाही. राहुल गांधींनी विजय वेडट्टीवार यांना विरोधी पक्षनेता मराठ्यांच्या मुलांचं वाटोळं करण्यासाठी दिले आहे. त्यामुळे त्याप्रमाणे ते बोलत असतील. तर, पंकजा मुंडे यांना गोरगरिबांची जाण आहे. गोपीनाथ मुंडे यांनी गोरगरिबांचे कल्याण करण्यासाठी काम केलं आहे. त्यामुळे त्या या सभेला आल्या नसतील असेही जरांगे म्हणाले.

आमच्या मराठ्याच्या नेत्यांना तुम्हाला पाडणे शक्यच नाही…

भुजबळांना निवडणुकीत पाडा असं मी कधीच म्हटलं नाही. आमच्या मराठ्याच्या नेत्यांना तुम्हाला पाडणे शक्यच नाही. आमचे नेते खूप नमुनेबाज असल्याचे जरांगे म्हणाले. तर, विजय वडेट्टीवार यांच्या टीकेला उत्तर देतांना जरांगे म्हणाले की. “तुम्ही खाता किती. आम्ही तुमच्या लेकरांबद्दल कधी वाईट बोललो नाही. बकरे वगैरे म्हणून दुसऱ्यांच्या मुलांना वाईट बोलू नका. आम्ही तुमच्या लेकरांचं बकरे म्हणून कधी उल्लेख केला नाही. पण असे बोलून तुम्ही मुलांचं अपमान करत आहात. यांचा तोल गेला असेल, असा टोला जरांगे यांनी लगावला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here