“ओबीसी नेत्यांनी ४० वर्षे आमचं आरक्षण…” मनोज जरांगे पाटील

0

जालना,दि.९: महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या गाठीभेटी घेण्यासाठी मी १५ नोव्हेंबर ते २३ नोव्हेंबरपर्यंत मी महाराष्ट्र दौरा करणार आहे अशी घोषणा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. वाशी परंडा, करमाळा, १६ नोव्हेंबरला दौंड, १७ तारखेला सांगली, इस्लामपूर, कऱ्हाड, १८ नोव्हेंबर सातारा, वाई, रायगड, १९ नोव्हेंबर रायगड दर्शन, महाड, मुळशी, आळंदी, २० नोव्हेंबर तुळापूर, खराडी, पुणे, चंदननगर, खालापूर, कल्याण, २१ नोव्हेंबर ठाणे, नाशिक, त्र्यंबकेश्वर, २२ नोव्हेंबर विश्रांतगड, संगमनेर, श्रीरामपूर, २३ नोव्हेंबर नेवासा, बोदेगाव त्यानंतर अंतरवली असा हा दौरा असणार आहे.

एकूण सहा टप्प्यात मी महाराष्ट्र दौरा करणार आहे. त्यापैकी हा तिसरा टप्पा आहे असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले. तसंच १ डिसेंबरला मराठा समाजासाठी महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावात साखळी उपोषण करायचं आहे त्याची तयारी सुरु करा असंही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

पैसे कमवण्यासाठीचं हे साधन नाही

राजकारणी, उद्योगपती, डॉक्टर यांना सगळ्यांना मी सांगू इच्छितो आम्ही सगळा दौरा आमच्या खर्चाने केला आहे. आमच्या नावाने कुणी पैसे मागितले असतील आणि ज्यांनी दिले असतील तर ते परत घ्या. आम्ही सामान्य माणसांचा लढा उभा केला आहे. पैसे कमवण्यासाठीचं हे साधन नाही. सामान्य मराठ्यांनाही कुणी एक रुपया देऊ नये आणि कुणाकडून घेऊ नये. यात पैशांचा काही संबंध नाही. जर कुणी पैसे दिले असतील, माझ्या नावाने पैसे मागितले म्हणून पैसे दिले असतील तर ते आत्ताच परत मागा. आमच्या आंदोलनाला कुठलाही डाग लागता कामा नये म्हणून मी हे आवाहन करतो आहे असंही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. तसंच ओबीसी नेत्यांनी ४० वर्षे आमचं आरक्षण खाल्लं हे सामान्य ओबीसींना पटलं आहे त्यामुळेच तो समाज आमच्या बाजूने आहे असंही जरांगे पाटील म्हणाले.

मराठा समाजाला आरक्षण मिळणारच आहे. कुणबी प्रमाणपत्रं मिळण्यास सुरुवात झाली आहे. २४ डिसेंबरला आपल्याला आरक्षण मिळणार आहे. मी आज आवाहन करतो की कुणीही आत्महत्या करु नये. मराठा आरक्षणासाठीची एकी आपली दिसली पाहिजे. काही मागेपुढे झालं तर आपल्याला सज्ज राहायचं आहे. कुणीही मतभेद होऊ देऊ नका. आपण एकजूट ढळू द्यायची नाही. आपली एकी आपण दाखवून देऊ असंही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

ओबीसी नेत्यांनी ४० वर्षे आपलं आरक्षण खाल्लं

छगन भुजबळ यांच्या विचारांमध्ये परिवर्तन होत नाही तर आम्ही तरी काय करणार? आम्ही आता त्यांना समजवणार नाही. त्यांना गोरगरीबांना आरक्षण मिळू द्यायचं नाही अशीच त्यांची इच्छा आहे असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले. ओबीसी नेत्यांनी ४० ते ५० वर्षे आपलं आरक्षण खाल्लं आहे. सामान्य ओबीसींना हे पटलं आहे. त्यामुळे ओबीसी नेत्यांचं आता सामान्य माणसांना पटेनासं झालं आहे. असंही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here