नवी दिल्ली,दि.27: शिवसेनेमध्ये (Shivsena) बंडखोरी झाल्यामुळे शिवसेना कुणाची असा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रकरणावर अखेर सर्वोच्च न्यायालयामध्ये घटनापीठासमोर सुनावणी सुरू झाली आहे. 16 आमदारांना अपात्र ठरले तर काय परिणाम होईल अशी शक्यता सुप्रीम कोर्टाने विचारली आहे. त्यानंतर घटनापीठातील 5 न्यायाधीश एकमेकांशी चर्चा करताना दिसले. जी व्यक्ती निवडणूक आयोगाकडे दाद मागत असेल तो अपात्र ठरला तर पुढे काय परिणाम होतील अशी विचारणा सुप्रीम कोर्टाने दोन्ही गटाच्या वकिलांना केली आहे.
त्यावर शिंदे गटाच्या वकिलांनी अपात्रतेबाबत कुठलाही निर्णय कोर्टाने घेतला नाही त्यामुळे या सदस्यांना विधिमंडळाच्या कामकाजात भाग घेता येतो. आमदार अपात्र आहेत की नाही याबाबत अध्यक्ष निर्णय घेऊ शकतात असं म्हटलं. मात्र त्यामुळे अध्यक्षांचा अधिकार सुप्रीम कोर्टाने मान्य केला तर तत्कालीन उपाध्यक्ष नाना झिरवाळ की आत्ताचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यात प्रश्न निर्माण होऊ शकतो.
शिवसेनेकडून कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला आहे. ‘आम्ही विरोधी गट आहे हे जरी शिंदे गट सांगत असेल पण विरोधी गट ठरवण्याचा अधिकार हा केंद्रीय निवडणूक आयोगाला नाही. सध्या सुप्रीम कोर्टात या संदर्भात सुनावणी सुरू आहे. त्यामुळे हा निर्णय सुप्रीम कोर्ट घेऊ शकतो. एकनाथ शिंदे हे केंद्रीय निवडणूक आयोग आयोगामध्ये दाद मागू शकत नाही’ असा दावा सिब्बल यांनी केला आहे. न्यायमूर्तींनीही याबद्दल विचार करण्यासाठी वेळ घेतला होता.
गेल्या तीन महिन्यांपासून सर्वोच्च न्यायालयामध्ये रखडलेल्या राज्यातील सत्तासंघर्षावरील याचिकांवर आज घटनापीठापुढे सुनावणी होत आहे. सुप्रीम कोर्टाच्या घटनात्मक खंडपीठाच्या कामकाजाला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाची सुनावणी न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठामध्ये होत आहे.
यावेळी शिंदे गटाकडून नीरज कौल यांनी युक्तिवाद केला. तर शिवसेनेकडून कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला.