मुंबई,दि.30: राज्यपालांच्या विधानावर प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी लोक निघून गेले तर या शहराला कोणी आर्थिक राजधानी म्हणणार नाही, अशा आशयाचं वक्तव्य राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी एका कार्यक्रमादरम्यान केलं होतं. ठाणे, मुंबई या शहरातून गुजराती, राजस्थानींना काढून टाकले तर तुमच्याकडे पैसेच उरणार नाही. मुंबई देशाची आर्थिक राजधानी म्हटलं जातं तेदेखील म्हणता येणार नाही असं वादग्रस्त विधान राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुंबईतील एका कार्यक्रमात केले आहे.
मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढल्यास मुंबई ही आर्थिक राजधानी राहणार नाही, असे वादग्रस्त वक्तव्य महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केल्यानंतर त्यांच्यावर सर्व स्तरातून टीका करण्यात येत आहे. तसेच कोश्यारी यांनी माफी मागावी, त्यांना राज्यपाल पदावरुन हटवावे अशी मागणी केली जात आहे. असे असताना वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी कोश्यारी यांच्या वक्तव्याचे समर्थन केले आहे. राज्यपालांच्या विधानामुळे महाराष्ट्राचा अपमान झालेला नाही. त्यांनी केलेले वक्तव्य योग्य असून मी त्याचे समर्थन करतो, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत. टीव्ही 9 मराठीने तसे वृत्त दिले आहे.
“राज्यपालांनी लगावलेला टोला हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील मराठी नेत्यांना आहे. या पक्षांनी एवढे वर्षे सत्ता उपभोगली. पण हे पक्ष अजूनही अर्थिक व्यवहार महाराष्ट्राच्या हातामध्ये देऊ शकलेले नाही. हा व्यवहार अजूनही गुजराती आणि राजस्थानी लोकांच्या हातात आहे. राज्यपालांच्या वक्तव्याने महाराष्ट्राचा बिलकूल अपमान झालेला नाही. त्यांनी सत्य परिस्थिती मांडली आहे,” अशी भूमिका प्रकाश आंबेडकर यांनी मांडली.
“इथल्या मराठा नेतृत्त्वाने आर्थिक व्यवहार मराठी माणसांच्या हातात दिलेला नाही, असे राज्यपालांनी सांगितले आहे. यामध्ये त्यांची उचलबांगडी कशाला करायची? मी तशी मागणी अजिबात करत नाही. उलट त्यांनी केलेले वक्तव्य योग्य आहे. मी राज्यपालांनी केलेल्या वक्तव्याचे समर्थन करतो,” असेही प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.
“राज्यपालांच्या या वक्तव्यामुळे इथल्या राष्ट्रवादी, काँग्रेस, भाजपा आणि शिवसेना या पक्षांचे चरित्र उघडे पडले आहे. इथल्या मराठी माणसाने हे समजून घेतले पाहिजे. त्यांनी मराठी माणसाला मोठा इशारा दिला आहे. राज्यपालांच्या वक्तव्याला या दृष्टीकोनातून पाहिले पाहिजे. मराठ्यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेस या बुजगावण्यांसोबत राहायचे की नवे नेतृत्व उभे करायचे हे ठरवले पाहिजे,” असे म्हणत नव्या नेतृत्वाची गरज असल्याचेही प्रकाश आंबेडकर यांनी नमूद केले.