मुंबई, दि.२: शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिवसेनेच्या खासदारांबाबत मोठं विधान केलं आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेला मोठे खिंडार पाडले. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. एकनाथ शिंदे आणि त्यांच्याबरोबर असणाऱ्या अनेक आमदारांनी राष्ट्रवादी व काँग्रेस बरोबर सत्तेत राहण्यास नकार देत बंडखोरी केली.
शिवसेनेच्या १९ पैकी १४ खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्याशी जुळवून घ्यावं अशी भूमिका पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर मांडली असल्याची माहिती समोर आली आहे. खासदारांनी आपली भूमिका व्यक्त केल्यानंतरही पक्षाकडून एकनाथ शिंदे यांच्यावर पक्षविरोधी कारवाई केल्यामुळे नेतेपदावरुन हकालपट्टी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे १४ खासदार आता वेगळी भूमिका घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. याबाबत संजय राऊत यांना विचारण्यात आलं असता त्यांनी सूचक विधान केलं आहे.
“खासदार फुटण्याच्या मार्गावर आहेत असं बोलणं चुकीचं आहे. काल आमच्या पक्षाच्या खासदारांची बैठक झाली. पण मी त्या बैठकीला उपस्थित राहू शकलो नाही. कारण त्याचवेळी मला भाजपाच्या एका शाखेनं बोलावलं होतं. बैठकीबाबत माझं पक्षप्रमुखांशी बोलणं झालं आहे. खासदारांच्या भावना काय आहेत त्यावर पक्ष प्रमुखांनी चर्चा केली. चर्चा होऊ शकते. खासदार गेले किंवा जातात असं होत नाही. शिवसेनेत आमदार आणि खासदार निवडून आणण्याची पूर्ण ताकद आहे. शेवटी खासदार कुठेही गेले तरी खालची कार्यकर्त्यांची फळी तयार असते. मतदार देखील पूर्णपणे शिवसेनेच्या बाजूने आहेत. हे तुम्ही लक्षात घ्यायला हवं”, असं संजय राऊत म्हणाले.
“माझ्यावर कितीही दबाव आणला गेला असता तरी मी शिवसेना सोडली नसती. मलाही पाडण्याचे प्रयत्न झाले. मी निवडणूक हरलो असतो तरी पक्ष सोडला नसता. मी बाळासाहेब आणि उद्धव ठाकरेंचा शिवसैनिक आहे. काही झालं तरी गुवाहाटीला जाणाऱ्यातला मी नाही”, असंही संजय राऊत म्हणाले.