मुंबई,दि.28: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या निवासस्थानी भाजपा नेत्यांची बैठक झाली. यानंतर या नेत्यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेतली आहे. भाजपाने राज्य सरकार अल्पमतात असून त्यांना बहुमत सिद्ध करण्यास सांगावे अशी मागणी राज्यपालांकडे केली आहे.
शिंदे गटात सहभागी झालेले बच्चू कडू आणि 10 आमदार उद्या मुंबईत येणार होते. ते राज्यपालांची भेट घेणार होते. दुसरीकडे शिंदे यांनी स्वत: आजचा एक दिवस उद्धव ठाकरेंना निर्णय घेण्यासाठी दिला होता. असे असताना गेल्या आठ दिवसांपासून चिडीचूप असलेले भाजपा नेते थेट राजभवनावर गेल्याने मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे.
सरकारला विश्वासदर्शक ठराव मांडायला सांगा, अशी मागणी हे भाजपा नेते करणार आहेत. यामध्ये फडणवीस यांच्यासोबत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर, आशिष शेलार आदी नेते आहेत. भाजपा नेत्यांनी राज्यपालांना भेटून बहुमत चाचणी घेण्यासाठीचे पत्र दिले आहे. आता राज्यपाल काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल यांची भेट घेऊन बहुमत चाचणीची मागणी केल्यानंतर एकनाथ शिंदे गटाची बैठक सुरू झाली आहे. एकनाथ शिंदे गट काय निर्णय घेतो हे पाहणे महत्वाचे आहे.