मुंबई,दि.24: शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटातील शिवसेना आमदारांची संख्या वाढतच आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी समर्थक आमदारांच्या बैठकीत एकनाथ शिंदे यांची गटनेतेपदावरून हकालपट्टी केली. त्यानंतर आता तर शिंदे गटाने विधानसभा उपाध्यक्षांना पत्र पाठवून गटनेतेपदी एकनाथ शिंदे यांच्या नियुक्तीचं पत्र दिलं. तसेच गुवाहाटीतून आमदारांच्या पाठिंब्याचे फोटो, व्हिडीओ, पत्र जारी केले. यानंतर महाविकासआघाडीतील ज्येष्ठ नेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आक्रमक होत शिंदे गटाला बहुमत गुवाहटीतून नाही, तर मुंबईत येऊन विधीमंडळात सिद्ध करावं लागेल, असं सांगत सूचक इशारा दिला.
आमदारांना आमदारकी वाचवण्यासाठी
विधान परिषदचे उपसभापती नीलम गोऱ्हे म्हणाल्या, “शिवसेनेत बंडखोरी करणाऱ्यांना त्यांची आमदारकी वाचवायची असेल, तर कुठल्यातरी पक्षात विलीन व्हावं लागेल. तसं झालं नाही तर अपात्रतेतून सुटका मिळणार नाही. विलीन होताना नोंदणीकृत पक्षात विलिन व्हावं लागेल किंवा स्वतःचा गट काढावा लागेल. त्यामुळे त्यांना शिवसेना पक्षाचं नाव किंवा चिन्ह वापरता येणार नाही. त्यामुळे त्यांना भाजपा किंवा बच्चू कडू यांच्या प्रहारमध्ये विलिन व्हावं लागेल.”
“निवडणूक आयोगाच्या नियमाप्रमाणे शिवसेना पक्षाची घटना आहे. त्याप्रमाणे कार्यकारणीच्या सदस्यांमार्फत प्रक्रिया करावी लागेल. विधिमंडळ पक्ष वेगळा आणि मूळ पक्ष वेगळा आहे. शिवसेनेच्या चिन्हासाठी ६ टक्के मतं मिळवावी लागतात. त्यामुळे विरोधकांना जोपर्यंत 4-6 टक्के मतं मिळत नाही तोपर्यंत निवडणूक आयोग चिन्ह गोठवत नाही. त्यांना निवडणूक आयोगाकडे जायचं असेल तर त्यांनी जावं,” असंही नीलम गोऱ्हे यांनी नमूद केलं.
शिवसेनेचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे पक्षातून बाहेर पडल्यानंतर त्यांना दुसऱ्या पक्षात विलीनच व्हावे लागले होते. पक्षप्रमुखांनी अर्ज केल्यानंतर विधानसभेचे अध्यक्ष त्या आमदाराची निवड गटनेता म्हणून करतात. पण, एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर त्यांची हाकलपट्टी करून तात्काळ अजय चौधरी यांची निवड गटनेते म्हणून करण्यात आली. विधानसभा उपाध्यक्षांनी त्याला मंजुरी दिली आहे. त्यामुळे शिंदे यांच्यासह त्यांच्या समर्थक आमदारांनी गट तयार केला, तरीही त्याला मान्यता मिळणार नाही. आता त्यांचा संपूर्ण गट दुसऱ्या पक्षात विलीन करण्याशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही. विधानसभेत बहुमत सिध्द करण्याची वेळ आल्यास तुम्ही कोणत्या पक्षाचे विचारल्यानंतर त्यांना विशिष्ट पक्षाचे नाव सांगावेच लागणार आहे. त्यामुळे सध्याचा पेच फार काळ राहणार नाही, असा विश्वास पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या टेक्निकल टीमने राज्यातील सर्व जिल्हाप्रमुखांना दिला.